प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या बदली घोटाळ्या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पोलीस चौकशी केल्यानंतर ठाकरे – पवार सरकार पुन्हा एकदा बचावाच्या पवित्र्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेली नोटीस म्हणजे समन्स नव्हे, असा खुलासा ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. Fadanavis Police Inquiry summons
देवेंद्र फडणवीस यांची रविवारी दोन तास सायबर पोलिसांनी चौकशी केली. फडणवीसांचा जबाब नोंदवला. फडणवीसांच्या या चौकशीवरुन भाजप नेते आक्रमक झाले असून हे ठाकरे – पवार सरकारचे कटकारस्थान आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. यावरुन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे.
फडणवीस यांना आतापर्यंत सहा वेळा नोटीस बजावली. पण ही नोटीस म्हणजे आरोपी म्हणून पाठवण्यात आली नाही, ही नोटीस म्हणजे समन्स नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हणाले.
– अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
राज्य गुप्तचर विभागाकडे असलेली गोपनीय माहिती बाहेर गेल्याने काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्यांचा संबंध आहे त्यांचा जबाब घेणे गरजेचे आहे. फडणवीस यांनी काही बदल्यांबाबतची माहिती समोर आणली, त्याबाबत माहिती घेण्यासाठी फडणवीसांना सहा वेळा नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस म्हणजे समन्स नसून, त्यांच्याकडून फक्त माहिती घेण्यासाठी ती पाठवण्यात आल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
– फडणवीसांचे पोलिसांना सहकार्य
पोलिस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात येत आहे. याआधी देखील फडणवीसांना या प्रकरणी सायबर पोलिसांनी पाच ते सहा वेळा नोटीस पाठवली होती. त्यावेळी सुद्धा त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले नव्हते, तर त्यांच्याकडे प्रश्नावली पाठवली होती. पण या प्रश्नावलीला फडणवीस यांनी उत्तरे न दिल्याने रविवारी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब पोलिसांनी घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांना संपूर्ण सहकार्य देणार असल्याचे सांगितले आहे, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App