सत्तेसाठी आधीच खुंटीला टांगलेले हिंदुत्व काल पाटण्याच्या वेशीवर नेऊन टांगले; उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शरसंधान

प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काल पाटण्यात झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामील झाले. ते त्या बैठकीत जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसले होते. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार शरसंधान साधले आहे.Eknath shinde targets uddhav thackeray over his shunning of hindutva

मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेतली राजकीय विसंगती समोर आणली आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्याशी युती करून भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये काही काळ सरकार चालवले होते, त्यावरून उद्धव ठाकरे सातत्याने भाजपला टोचत असतात. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्याशी उद्धव ठाकरेंनी साधलेल्या जवळीकीवरून त्यांच्यावर तोफ डागली आहे.



या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात :

मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत.

सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे. आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. मोदीजींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदीजींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल.

कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का??

Eknath shinde targets uddhav thackeray over his shunning of hindutva

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात