– एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना रोकडा सवाल Eknath Shinde
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही अशी ओरड काही जण करतात, पण घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या व्यथा समजतील का??, असा रोकडा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना केला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चांदिवली येथे आज महायुतीची विराट जनसभा झाली. यावेळी मुंबईला विकासाकडे घेऊन जायचे असेल तर महायुतीला पर्याय नाही असे नमूद केले.
बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही अशी ओरड काहीजण करत आहेत, मात्र घरात बसून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुंबई आणि मुंबईकरांच्या व्यथा कधीच समजणार नाहीत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी हाणला.
मुंबईच्या रस्त्यांवर उतरून, कामातून उत्तर देणारे आम्ही आहोत, तर केवळ भाषणांपुरते मर्यादित राहणारे मुंबईकरांचे खरे हितचिंतक असू शकत नाहीत, “मुंबई म्हणजे फक्त एसी रूममधून भाषण करणं नाही. मुंबई म्हणजे पावसात रस्त्यावर उतरून नालेसफाई पाहणं, पूरग्रस्त भागात लोकांच्या भेटीला जाणं आणि अडचणीत असलेल्या मुंबईकरांच्या पाठीशी उभं राहणं असल्याचे यावेळी अधोरेखित केले. मुख्यमंत्री असताना आपण केवळ फाईलींवर सही करत बसलो नाही, तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
– त्यांनी दिली स्थगिती
मेट्रोची कारशेड, रस्ते काँक्रीटीकरण, पुनर्विकास अशा महत्त्वाच्या प्रकल्पांना ज्यांनी स्थगिती दिली, तेच आज विकासाचे प्रश्न विचारत आहेत. आम्ही सत्तेत आल्यानंतर थांबलेली कामे पुन्हा सुरू केली. मुंबईतील सिमेंटचे रस्ते, मेट्रो प्रकल्प, कारशेड, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मोठी उद्याने आणि सेंट्रल पार्क, बोर्ड टॅक्सी, बीकेसी मध्ये भुयारी पार्किंगची कामे आम्ही पुढे नेली असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. अशा अफवा पसरवणारे मुंबईकरांचे खरे हितचिंतक नाहीत. मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि तशीच राहणार, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
आम्ही मालक नाही, सेवक आहोत. मुंबईकर हेच या शहराचे खरे मालक आहेत. काम करणाऱ्यांनाच जनता पुन्हा संधी देईल. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार दिलीप लांडे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार अशोक पाटील, माजी आमदार मंगेश सांगळे, माजी महापौर दत्ता दळवी, अशोक पांगारे तसेच शिवसेना सर्व पदाधिकारी, महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App