विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वर्षानुवर्षे ज्येष्ठ – बडे – हेवीवेट अशा नावांची चलती होती परंतु 2024 च्या मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात ज्येष्ठ, बडे, हेवीवेट, जुने आणि जाणते या शब्दांचे ओझे उतरवून टाकले. भाजपने फडणवीस मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिलीच, पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांनाही नव्या चेहऱ्यांना संधी देणे भाग पाडले.Devendra fadnavis dropped heavyweights from his cabinet
भाजपासाठी नवीन प्रयोग नवीन नाहीत खुद्द देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविणे हाच 2014 चा नवा प्रयोग होता, तो यशस्वी झाला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तीन वेळा विधानसभेत 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले.
पण सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, यांना मंत्रिमंडळातून भाजपने वगळले, तरी त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी सोपविण्याची चर्चा आहे. सुरेश खाडे, सोलापूर जिल्ह्यातले दोन्ही देशमुख यांनाही भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिले नाही.
एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लो प्रोफाइल शिवसेना नेत्याला ठाकरे प्रभावातून बाजूला काढून पूर्णपणे शिवसेना ताब्यात घेण्यासाठी मदत करणे हा भाजपचा गेला अडीच वर्षातला दुसरा मोठा यशस्वी प्रयोग होता. त्या पाठोपाठ अजित पवारांना संपूर्ण राष्ट्रवादी संघटना ताब्यात घेण्यासाठी मदत करणे हा भाजपचा तिसरा प्रयोग देखील यशस्वी झाला.
त्या पाठोपाठ मंत्रिमंडळ विस्तारात जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांचा समावेश करणे आणि मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलणे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला. आपण जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहोत, असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांचा फडणवीसांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे भाजपकडून जुन्या आणि नव्यांचा संगम करत मंत्रिमंडळाची रचना बनलीच पण त्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून वगळून टाकले. अब्दुल सत्तार यांनी तर मध्यंतरी मुख्यमंत्री बदलू शकतो, अशी दमदाटीची भाषा केली होती. पण एकनाथ शिंदे यांनी सत्तारांचा पत्ता कापून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
– मंत्र्यांची संस्थाने अजितदादांकडून मोडीत
अजित पवारांच्या राष्ट्रवादी त्यापेक्षा मोठा प्रयोग झाला. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल भाईदास पाटील वर्षानुवर्षे मंत्रीपदावर असायचे. त्यांना अजित पवारांनी वगळून राष्ट्रवादीतून इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील या नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यामागे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आणि पक्ष म्हणून भाजपचा मोठा रेटा होता. राष्ट्रवादीतून तेच तेच चेहरे वर्षानुवर्षे मंत्री होत होते. त्यात शरद पवार किंवा अजित पवार फारसा कुठल्या बदल करू शकले नव्हते. किंबहुना राष्ट्रवादीतल्या मंत्र्यांची संस्थानेच तयार झाली होती, ती फडणवीस यांच्या रेट्यामुळे अजित पवारांना मोडीत काढावी लागली.
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारातून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपणच संपूर्ण मंत्रिमंडळाचे “बॉस” आहोत, हे दाखवून दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App