विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजी नगरमध्ये काल भले महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा पार पडली असेल, आणखी 10 सभा महाराष्ट्रात अपेक्षित असतील, पण महाविकास आघाडीची वज्रमूठ मूळात तितकी घट्ट आहे का??, हा खरा प्रश्न आहे. कारण महाविकास आघाडीच्या वज्रमुठीची सैल बोटे पहिल्या सभेपासूनच दिसायला लागली आहेत. किंबहुना महाविकास आघाडीची वज्रमुठ आवळण्यापूर्वीच ही बोटे सैलावली असल्याचे दिसले आहे. Cracks in maha vikas aghadi even after vajramuth rally in Sambhajinagar
उद्धव ठाकरे – फडणवीस भेट
विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांना सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा जो दम भरला त्यातूनच महाविकास आघाडीची वज्रमूठी सैल असल्याचे स्पष्ट झाले. उद्धव ठाकरेंनी दम भरल्यानंतर शरद पवारांनी राहुल गांधींची समजूत काढल्याचे सांगितले जाते. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी 18 पक्षांची बैठक भरली होती, त्या बैठकीत राहुल आणि सोनियांना काही म्हटल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात शरद पवार, संजय राऊत यांनी सोनिया गांधींची एकट्याने भेट घेतली आणि त्यांना देवेंद्र फडणवीस – उद्धव ठाकरे यांच्या भेटीची माहिती सांगितली. त्यानंतर राहुल गांधी सावरकरांच्या मुद्द्यावर “गप्प” झाले!! अशी महत्त्वाची आतल्या गोटातली माहिती आहे. याचा अर्थ आघाडीच्या वज्रमुठीतला मूळ अंगठाच सैल झाला आहे हे दिसते!!
तब्येत बरे नसलेले नाना 12 तासांत बरे
कालच्या वज्रमूठ सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर नव्हते. त्यांची तब्येत बरी नव्हती. पण महाविकास आघाडीची सभा झाली आणि 12 तासांत नाना बरे होऊन राहुल गांधींना भेटायला सुरतला पोहोचले देखील!! तब्येत बरे नसलेल्या नानांनी असे कोणते औषध घेतले की ज्यामुळे ते बरे झाले??, याचे उत्तर संजय राऊत यांच्याकडे नसल्यामुळे दिल्लीतल्या आजच्या नियमित पत्रकार परिषदेत त्यांनी नाना पटोले यांनी काल विश्रांती घेतली आणि आज ते सुरतला राहुल गांधींना भेटायला गेले, असे सांगितले.
अशोक चव्हाण अस्वस्थ
कालच्या वज्रमूठ सभेत जोरदार भाषण करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रचंड अस्वस्थ आहेत त्यांचे आणि नाना पटोले यांचे अजिबात जमत नाही. नानांचे आणि बाळासाहेब थोरात यांचे देखील जमत नाही. त्यामुळे अशोक चव्हाण हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा रस्ता पकडतील, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. आता या दाव्यात तथ्य किती?, हे समजण्यासाठी पुढचे निदान 11 महिने तरी वाट पाहावी लागेल. पण या दाव्यात अजिबात तथ्यच नाही, असा दावाही करता येणार नाही!!
विखे विरुद्ध थोरात
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचे देखील फारसे जमत नाही. पण बाळासाहेब थोरात यांचे नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटलांशी असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिकडे विखे त्याविरुद्ध थोरात हे समीकरण आहे. आज राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात काँग्रेसमध्ये आहेत. जर विखे पाटील काँग्रेसमध्ये राहिले असते, तर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये आले असते. हे साधे समीकरण आहे.
महाविकास आघाडीत आघाडीची छत्रपती संभाजीनगरात वज्रमूठ सभा झाली असली, तरी प्रत्यक्षात त्या सभेपूर्वीच या वज्रमूठीची बोटे किंबहुना मूळ अंगठा सैलावलेला आहे. बाकीची बोटेही हळूहळू सैलावत आहेत आणि त्यावर शिवसेना – भाजपचा डोळा आहे हे स्पष्ट दिसते आहे, फक्त उघडून डोळे नीट बघण्याची गरज आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App