विशेष प्रतिनिधी
मुंबई : बदलत्या जीवनशैलीत सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळेत येण्यासाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली. Change school timings to help kids catch up on sleep: Maharashtra governor Ramesh Bais
“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानाचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांवरील ताण दूर करण्याच्या दृष्टीने राज्यपाल बैस यांनी शिक्षण विभागाला अनेक सूचना केल्या. मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकविहीन शाळा, ई-वर्ग यांना चालना द्यावी. शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करून त्यांना बक्षिसे द्यावीत. यातून शाळांमध्ये सुधारणेसाठी स्पर्धा होईल,’ असे बैस यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आनंददायी ठरावे यासाठी शिक्षकांनी त्यांना गृहपाठ कमी द्यावा; तसेच खेळ आणि इतर कृतिशील उपक्रमांवर भर द्यावा, सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण व्हावे यासाठी शाळांमध्ये व्याख्याने, सत्रांचे आयोजन करावे. राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये आहेत. मात्र ही ग्रंथालये आज ओस पडली आहेत. बहुतांश पुस्तके जुनी किंवा कालबाह्य झाली आहेत. सर्व वाचनालयांना इंटरनेट, कम्प्युटर सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना सुरू केली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, ‘गोष्टींचा शनिवार’, ‘आनंददायी वाचन’, ‘दत्तक शाळा उपक्रम’, ‘माझी शाळा, माझी परसबाग’, ‘स्वच्छता मॉनिटर-२’ आणि मुंबई महापालिकेच्या नवीन शालेय इमारतींचे लोकार्पण आदी योजनांचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुरज मांढरे आदी उपस्थित होते.
आदर्श शाळा निर्माण करण्यावर सर्वांनीच भर द्यावा. गावांमध्ये एकवेळ मंदिर, मशिद अथवा चर्च नसले तरीही चालेल, मात्र गावात आदर्श शाळा असावी,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उद्योगपती मुकेश अंबानी हे शाळांच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी गुंतवणूक करण्यास तयार असल्याची माहितीही शिंदे यांनी या वेळी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App