विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitin Gadkari भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या रुपाने पक्षाचा तळागाळातील हाडाचा कार्यकर्ता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे. भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी असून सामान्य कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, हे केवळ भाजपामध्येच शक्य आहे,असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.Nitin Gadkari
मुंबईत परिषदेत भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. गडकरी म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेला, कोणताही मोठा पाठबळ नसलेला, पण कार्यकर्त्यांच्या भावनेतून आणि जमिनीवर काम करून पुढे आलेला कार्यकर्ता आज पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे. रविंद्र चव्हाण यांचे आई-वडील कोणी राजकारणी नव्हते. त्यांच्या पाठीशी कोणताही उद्योग, पैसा किंवा सत्ताधारी गट नव्हता. तरीही त्यांनी कोकणातील गावोगावी जाऊन संघटन वाढवले, लोकांशी नातं जोडले आणि पक्षाचा पाया मजबूत केला. अशा दैवदुर्लभ कार्यकर्त्यांमुळेच भाजपा मोठा झाला आहे.”ही निवड कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करणारी आहे. एक सामान्य कार्यकर्ता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, हा संदेश सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.”
गडकरी म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व सक्षम आहे. त्याचबरोबर आता संघटनात्मक पातळीवरही रविंद्र चव्हाण यांच्यामुळे अधिक गतिमानता येईल. महायुती सरकार आणि संघटनेचा हा समन्वय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित ‘शिवशाही’ प्रस्थापित करेल, असा आमचा विश्वास आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ११ वर्षांत जेवढी कामं झाली, तेवढं काँग्रेसला ६० वर्षांत जमलं नाही. आपल्याला अजून काम करायचं आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचवायचं आहे आणि यासाठी महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
मावळते प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव करताना गडकरी म्हणाले, “ते पक्षाचे संघर्षशील आणि झपाटलेले नेतृत्व होते. रात्रंदिवस प्रवास करून त्यांनी पक्षाला विधानसभेच्या लढाईत यश मिळवून दिले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला कार्यकर्ता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनतो आणि यशस्वी ठरतो, हे भाजपातच घडते.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App