विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे – पवारांपुढे काँग्रेस नेते झुकल्याने पक्ष अधिकच खिळखिळा झाला, पण लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आणखी मोठे राजकीय भूकंप होतील, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचे पुरते वाभाडे काढून काँग्रेस का आणि कुणामुळे खिळखिळी झाली??, याची कारणेच विशद केली आहेत. Bigger earthquake after Lok Sabha elections in Congress
अशोक चव्हाण म्हणाले :
– लोकसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रात आणखी मोठे राजकीय भूकंप होतील. बरेच नेते मोठा निर्णय घेतील, सगळे मोठे नेते सोडून जात आहेत. संजय निरुपम, मिलिंद देवरांसारखे नेते बाहेर पडले आणखी अनेक नेते अस्वस्थ आहेत त्यांना आपल्या भविष्याची चिंता असल्याने ते लवकरच योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे.
– भाजपमध्ये मला पूर्ण मानसन्मान मिळतोय. असून पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली, ती मी चोखपणे पूर्ण करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा माझा हात धरत लोकांना अभिवादन केलं, तो क्षण माझ्यासाठी अमूल्य होता. तसं पाहिलं तर, मी भाजपमध्ये येण्याआधी मोदींना बऱ्याच वेळेला भेटलोय. पण, बऱ्याच भेटींबद्दल कॅमेरासमोर बोलता येत नाही. देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचं सरकार येईल, याची मला खात्री आहे.
– ज्या पक्षाचं भविष्य नाही, त्या पक्षात आपलं भविष्य काय होणार. जिंकण्याचं जिद्द नाही, पक्ष पुढे नेण्याची पक्ष नेतृत्वालाच इच्छा नाही तिथे थांबून मी करणार काय??, काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीसाठी विद्यमान नेतृत्वच जबाबदार आहे. नाना पटोलेंसारखे “थोर विद्वान” जर पक्ष चालवत असतील तर त्या पक्षाचे काय होणार??
– नाना पटोले सगळं स्वतःच्या इच्छेनुसार करतात. कोणाला ही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्षा आहेत, पण त्यांना न विचारता मुंबईच्या जागांचे वाटप करून उमेदवारही घोषित झाले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावापुढे काँग्रेस नेते झुकले. शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाला ज्या जागा हव्या होत्या, त्या त्यांनी परस्पर घेतल्या आणि जे उरलं सुरलं आहे ते कांग्रेसला मिळालं. राज्यातल्या नेतृत्वाने याबाबत काहीच केलं नाही. मी काँग्रेसमध्ये असतो, तर ठाकरे – पवारांचा दबाव सहनच केला नसता!!
– नाना पटोले आणि काँग्रेस नेते माझ्यावर आरोप करतात की, जागावटापाची बोलणी केल्यानंतर अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला. त्यामुळे, काँग्रेसचे नुकसान झालं. महाविकास आघाडीत मी सुरुवातीची चर्चा निश्चित केली, पण मला जे दिसलं ते पाहताच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मी निघालो तर नाना पटोले आणि इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे, पवार यांच्यासमोर हिंमत दाखवत काँग्रेसच्या हक्काच्या जागा मागून का घेतल्या नाहीत?? स्वतःच्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडायची त्यांची जुनी सवय आहे.
आदर्श काँग्रेस काळातच झालेलं
उद्धव ठाकरे यांच्याकडे काही बोलायला नाही म्हणून ते आदर्श मुद्द्यावरून टीका करत आहेत. आदर्श एक संपलेला विषय आहे. त्यासोबत भाजपला जोडणे चुकीचं असून आदर्श हा विषय काँग्रेसच्या काळात झाला, मग त्यात भाजपचा काय संबंध??, काँग्रेस सरकार असताना हे सगळं झालं. त्यामुळे, काय खरं काय खोटं हे काँग्रेसनेच सांगावं!!
राहुल गांधी खोटं बोलताहेत
राहुल गांधी यांनी माझ्याबद्दल केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. मी कधीच सोनिया गांधींसमोर गेलो नाही आणि रडलोही नाही!! आता भविष्य भाजपसोबत आहे, भाजपला पुढे नेण्याचं काम मी करणार. मी काही मिळेल या अपेक्षेने भाजपमध्ये नाही गेलो, पण जी जबाबदारी पक्ष नेतृत्व देईल, ती स्वीकारुन काम करणार आहे. माझी मुलगी राजकरणात नुकतीच आली आहे, ती आता सगळं बघतेय, शिकतेय. तिला पक्ष काय जबाबदारी देईल हे माहिती नाही. पण, आपण काम करत राहायचं हेच आमचं धोरण आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App