विशेष प्रतिनिधी
नागपूर : Bachchu Kadu मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी देखील याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असे वक्तव्य केल्याने या चर्चेला अधिक जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे. शरद पवार व अजित पवार एकत्र येण्याची गरज काय? ते आधीपासून एकत्र असल्याचे असल्याचे बच्चू कडू म्हणाले.Bachchu Kadu
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने नागपूरमध्ये रक्तदान आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरचे काही मीटर अंतरावर असलेल्या ट्राफिक पार्क येथे हे आंदोलन पार पडले. या आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी उपरोक्त दावा केला आहे.
नेमके काय म्हणाले बच्चू कडू?
शरद पवार व अजित पवार एकत्र येण्याची गरज काय? असा सवाल करत ते आधीपासून एकत्र असल्याचे बच्चू कडू म्हणाले. दोन्ही पवार एकत्र असल्याचे माझ्याकडे अनेक पुरावे आहे, असा दावाही बच्चू कडू यांनी केला. जशी चाणक्य नीती आहे, तशी पवार नीती असल्याचे ते म्हणाले.
भाजप औरंगजेबासारखे मराठी माणसावर चालून येतंय
याशिवाय, कडूंनी राज्य सरकारवर आणि भाजपवरही जोरदार टीका केली. कोकण व मुंबईतील मराठी मतदारांची नावे मतदार यादीत दोन्हीकडे असलेल्या नागरिकांना मुंबईत मतदान करण्यापासून रोखण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी भाजप नवीन परिपत्रक आणण्याच्या तयारीत असल्याचा दावाही त्यांनी केला. दोन ठिकाणी मतदान केल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या तयारीही राज्य सरकारने दर्शवली आहे. मतदार कार्ड आधारशी लिंक हा त्याचाच एक भाग असल्याचे बच्चू कडू म्हणाले. भाजप औरंगजेबासारखे मराठी माणसावर चालून येत असल्याचेही ते म्हणाले.
राज्यकर्त्यांना बोलते करण्यासाठी रक्तदान आंदोलन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरही बच्चू कडूंनी सरकारला धारेवर धरले. नागपूरमधील धरमपेठ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ त्यांनी ‘रक्तदान आंदोलन’ केले. राज्यकर्त्यांना बोलते करण्यासाठी आम्ही रक्तदान आंदोलन करत असल्याचे असे ते म्हणाले. आता कर्जमाफी केली तर मतदार विसरुन जाईल, म्हणून राज्य सरकार कर्जमाफीसाठी येणाऱ्या निवडणुकीची वाट पाहत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर, 2 जून रोजी अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी आंदोलन करण्याची घोषणा बच्चू कडूंनी केली आहे. फडणवीस यांनी प्रचारादरम्यान सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App