विशेष प्रतिनिधी
मुंबई : देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या विजयामुळे राज्यातले काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांचे राजकीय वजन वाढल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. Ashok Chavan’s weight increased with the victory of Deglaur, but exactly how much ?? … as much as the post of Chief Minister ??
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून अशोक चव्हाण यांचे विशेष अभिनंदन केल्याने त्यांचे राजकीय वजन वाढल्याच्या या बातम्या आहेत. त्याही पुढे जाऊन अशोक चव्हाण यांचे मिळवणे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांनी एक राजकीय वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देगलूर बिलोली मतदार संघात काँग्रेसने विजय तर मिळवला. आता अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य भास्कर पाटील खतगावकर यांनी केले आहे आणि येथेच अशोक चव्हाण यांच्या राजकीय वजन वाढण्यातली “खरी मेख” आहे.
एका मतदार संघातल्या पोटनिवडणुकीतल्या विजयाने फार तर पक्षाचा आमदार टिकवता येईल किंवा वाढवता येईल. तसा काँग्रेसने देगलूर बिलोली मतदारसंघातला आमदार टिकवला आहे. काँग्रेसच्या एकूण आमदारांच्या संख्येत वाढ झालेली नाही. कारण तिथे रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसचेच विद्यमान आमदार होते. अशा स्थितीत केवळ जागा टिकविल्याने अशोक चव्हाण यांचे वजन मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्या इतपत वाढले असेल तर ते महाविकास आघाडीतील अन्य दोन घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना चालणार आहे काय?, हा खरा प्रश्न आहे.
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांचे नुसते अभिनंदन करण्याने जर राजकीय वजन वाढत असते तर मग काँग्रेसला दुसरे काय हवे होते?? आज काँग्रेस राजकीय बळाच्या दृष्टीने चौथ्या स्थानावर आहे. आमदारांची संख्या 44 आहे. या संख्येच्या बळावर अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतील असे म्हणणे नुसते दिवास्वप्नच नाही का??
काँग्रेस एकेकाळी महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष होती. परंतु ती घसरण आता चौथ्या नंबरवर येऊन पोहोचली आहे. हे राजकीय वास्तव विसरून कसे चालेल?? त्यामुळे देगलूर बिलोलीची जागा टिकवून धरली हे अशोक चव्हाण यांचे मूळ श्रेय आहे. बाकीच्या अभिनंदनाचा सगळा मुलामा आहे आणि देगलूरच्या एका विजयातून अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची पर्यंत पोहोचवणे हे दिवास्वप्न आहे. याचे भान काँग्रेसजनांना आहे का? हा खरा प्रश्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App