नाशिक : अजितदादांचा वारस निवडण्यासाठी पडद्यामागे हालचाली; पवारांच्याच घरातून चर्चा तीन नावांची!!, हे राजकीय वास्तव अजितदादांना निरोप देण्याच्या दिवशी समोर आले. Ajit Pawar
बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांना शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. त्यानंतर लगेच अजित पवारांच्या राजकीय वारसाची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या चर्चेला सुरुवात केली. त्यांनीच सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी समोर आणले. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले.
सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारून विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारावे अशा सूचना पुढे आल्या.
– पवार समर्थकांमध्ये अस्वस्थता
त्याचवेळी शरद पवारांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली. त्यामुळे त्यांनी वेगळ्या मार्गाने सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आणले. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना अनुभव नाही. त्यामुळे कदाचित सुप्रिया सुळे यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले जाईल आणि त्यावरच मोहोर उमटवली जाईल, अशा अटकळी “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी बांधून त्या बातमीच्या पुड्या माध्यमांमध्ये सोडून दिल्या. त्याचवेळी पवार समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या बातम्या देखील महाराष्ट्राच्या राजकीय हवेत सोडल्या. तुमचे पवार साहेबांशी चांगले संबंध आहेत. तुम्ही पवार साहेबांशी बोला. त्यांना 12 डिसेंबरला वाढदिवसाचे राष्ट्रवादीच्या एकीकरणाचे गिफ्ट देऊ, असे अजित पवार म्हणाल्याची आठवण अंकुश काकडे यांनी आजच सांगितली. या आठवणीतून त्यांनी शरद पवारच दोन्ही राष्ट्रवादींचे नेतृत्व करतील, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.
– रोहित पवारांचे नाव समोर
त्याचवेळी रोहित पवारांच्या समर्थकांनी त्यांचे नेतृत्व तरुण म्हणून पुढे आणले. अजित पवार यांचा राजकीय वारसा दीर्घकाळ पुढे न्यायचा असेल, तर रोहित पवार यांचे नेतृत्व राष्ट्रवादीने स्वीकारावे, अशी सूचना रोहित पवारांच्या काही समर्थकांनी केली.
– घरातच स्पर्धा
या सगळ्यामुळे अजित पवार यांचा राजकीय वारसा संभाळण्यासाठी त्यांच्या एवढे समर्थ नाव पवारांच्या घरात नाही त्याचबरोबर पवारांच्या पक्षातही नाही त्यामुळे अजितदादांचा राजकीय वारसा चालविण्याच्या दृष्टीने कुठल्या एका नेत्याचे नाव समोर येण्यापेक्षा तीन नेत्यांची नावे पवारांच्याच घरातून स्पर्धेत आली. किंबहुना आणावी लागली. मात्र यापैकी एकाही नेत्याला अजित पवार यांच्यासारखा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव नसल्याने जो कोणी नेता होईल, तो भाजपच्या मर्जीने होईल आणि भाजपच्याच नेतृत्वाच्या मर्जीने त्याला त्याच्या वाट्याला आलेला राज्यकारभार हाकावा लागेल, हे राजकीय वास्तव सुद्धा या निमित्ताने समोर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App