विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांकडून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खेचून घेतल्यानंतर काका – पुतण्यांमधला राजकीय संघर्ष आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बँक खाते आणि मुंबईतील बॅलेट पियर येथील मुख्यालय आपल्याकडे खेचून घेण्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. Ajit pawar – sharad pawar factions lock horns over bank account of NCP and main office
बारामतीवर राजकीय कब्जा मिळवण्यासाठी काका पुतण्या यांच्यात संघर्ष सुरू आहेत पण त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ बँक खाते, त्यातले व्यवहार यावरचे नियंत्रण मिळवणे तसेच महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयावर ताबा मिळवण्यासाठी नवा संघर्ष सुरू झाला आहे. लोकसभा निवडणूक अधिकृत रीत्या जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे बँक खाते आणि मुख्यालय आपल्या ताब्यात यावे यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांना रोखण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तयारीत आहे.
अजितदादांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांचे खाते असलेल्या बँकेला एक पत्र पाठवले आहे. यामध्ये आपल्या परवानगीशिवाय बँकेच्या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली होती तेव्हा ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातून 50 कोटी रुपये काढून घेतल्याची चर्चा आहे. त्याची इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चौकशी देखील सुरू केली आहे.
नेमका तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्याबाबत घडू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार गटाने बँकेला पत्र पाठवून शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाच्या बँक खात्याशी संबंधित कोणतेही व्यवहार करुन देऊ नयेत, यासाठी बँकेला पत्र पाठवल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय असलेले बॅलर्ड पिअर येथील कार्यालयही ताब्यात घेण्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न आहेत. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे बँक खाते आणि बॅलर्ड पिअर येथील मुख्यालय अजित पवार गटाला मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली घडल्या नव्हत्या. त्यामुळे आता अजित पवार गट लोकसभा निवडणुकीपूर्वी बॅलर्ड पिअर येथील राष्ट्रवादीचे कार्यालय आपल्या ताब्यात घेऊ शकतो. तसे झाल्यास शरद पवार गट आक्रमक होऊ शकतो. परिणामी अजित पवार गट आणि शरद पवार गटात संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App