वृत्तसंस्था
टोरंटो : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येचा तपास करण्यात देशातील सुरक्षा यंत्रणा व्यग्र आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. Trudeau said in the Canadian Parliament – India may have a hand in the killing of Khalistani terrorist Nijjar!
ओटावा येथील हाऊस ऑफ कॉमन्सला संबोधित करताना ट्रूडो म्हणाले की, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येतील संभाव्य संबंधाच्या आरोपांची सक्रियपणे चौकशी करत आहेत.
कॅनडाच्या नागरिकाच्या स्वत:च्या भूमीवर झालेल्या हत्येमध्ये इतर कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही, असे ट्रूडो म्हणाले. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे, जे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हे मूलभूत नियमांच्या विरुद्ध आहे ज्याद्वारे मुक्त आणि लोकशाही समाज कार्य करतो.
ते म्हणाले की, भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक संतप्त आहेत आणि कदाचित घाबरलेही आहेत. त्यामुळे आम्हाला बदलण्यास भाग पाडू नका.
भारताचा मोस्ट वॉन्टेड आणि खलिस्तानी दहशतवादी निज्जर याची 18 जून रोजी कॅनडातील सरे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॅनडातील गुरुद्वाराबाहेर निज्जरवर गोळ्या झाडण्यात आल्या.
काय म्हणाले संसदेत ट्रूडो?
आज मला एका अत्यंत गंभीर विषयाची सभागृहाला जाणीव करून द्यायची आहे. मी थेट विरोधी पक्षांच्या नेत्यांना कळवले आहे, पण आता मला सर्व कॅनेडियन लोकांना सांगायचे आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संभाव्य कनेक्शनच्या विश्वसनीय आरोपांची सक्रियपणे चौकशी करत आहेत. कॅनडा हा कायद्याचे पालन करणारा देश आहे. आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण मूलभूत आहे.
आमच्या सुरक्षा एजन्सी आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींनी सर्व कॅनेडियन लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या हत्येतील दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. कॅनडाने हा मुद्दा भारत सरकारचे उच्च अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. गेल्या आठवड्यात, मी वैयक्तिकरीत्या हा मुद्दा थेट पंतप्रधान मोदींसोबत G20 मध्ये मांडला होता. आपल्याच भूमीवर कोणत्याही कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत परदेशी सरकारचा सहभाग म्हणजे आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे.
या अत्यंत गंभीर प्रकरणावर आम्ही आमच्या भागीदारांसोबत जवळून काम करत आहोत. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी मी भारत सरकारला कॅनडाला सहकार्य करण्याची विनंती करतो.
मला माहिती आहे की बरेच कॅनेडियन, विशेषत: भारतीय वंशाचे कॅनेडियन समुदाय सध्या नाराज आहेत आणि कदाचित घाबरलेही आहेत. अशा घटना आम्हाला बदलण्यास भाग पाडू देऊ नका. आपण आपल्या लोकशाही तत्त्वांवर आणि कायद्याचे पालन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर शांत आणि ठाम राहूया. ही आमची ओळख आहे आणि आम्ही कॅनेडियन म्हणून हेच करतो.
भारतीय राजनयिकाची कॅनडातून हकालपट्टी
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येबाबत संसदेत पंतप्रधान ट्रुडो यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कॅनडाने एका उच्च भारतीय राजनयिकाची हकालपट्टी केली आहे. निज्जर याच्या हत्येच्या तपासात भारतीय मुत्सद्दी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केला आहे.
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली म्हणतात, ‘जर हे सर्व खरे असल्याचे सिद्ध झाले तर ते आमच्या सार्वभौमत्वाचे आणि एकमेकांशी वागण्याच्या मूलभूत नियमांचे मोठे उल्लंघन असेल. त्यामुळेच आम्ही एका सर्वोच्च भारतीय मुत्सद्याची हकालपट्टी केली आहे. पीएम ट्रुडो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला आहे.
जी-20 मध्ये मोदी ट्रुडोंना काय म्हणाले…
G20 दरम्यान पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी पीएम मोदींनी ट्रुडो यांच्यासमोर खलिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी त्यांना कॅनडातील अतिरेकी घटकांकडून सुरू असलेल्या भारतविरोधी कारवायांबाबत भारताच्या चिंतेची माहिती दिली होती.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, अतिरेकी फुटीरतावादाला प्रोत्साहन देत आहेत, भारतीय मुत्सद्द्यांविरुद्ध हिंसाचार भडकवत आहेत, राजनैतिक संकुलांना लक्ष्य करत आहेत. कॅनडातील भारतीय समुदाय आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करत आहेत. हे सर्व कॅनडासाठीही चिंतेचा विषय आहे.
कोण होता हरदीप सिंग निज्जर?
निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. तो गेली अनेक वर्षे कॅनडात राहत होता आणि तेथून भारताविरुद्ध खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालत होता. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जर गेल्या वर्षभरात भारतीय तपास यंत्रणांसाठी आणखी मोठी डोकेदुखी बनला होता, कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांना परदेशात रसद आणि पैसा पुरवायला सुरुवात केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App