शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा ठाम दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा ही एकप्रकारचा अन्यायच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
ऐन दिवाळी राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई आणि उपनगरांसह विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांवर पावसाने जोरदार हल्ला चढवला. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे विधान करून हे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधत ते नक्की मराठीच आहेत ना? असा सवाल केला आहे. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असा खोचक टोलाही राऊतांनी यावेळी कोठारेंना हाणला.
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे केवळ सत्ता व खुर्चीसाठीच एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी आमदारांना कथितपणे मारून टाकण्याची भाषा करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला.
नवी मुंबईच्या वाशी परिसरातील सेक्टर 14 मधील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांची चिमुरडी आणि एका 84 वर्षीय आजीचा समावेश आहे.
आशियातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मागील काही वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज सुरू आहे. अशा स्थितीत महापालिकेतील बदली आणि बढती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आले आहेत. या संदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सलग धक्के बसत आहेत. राज्यभरात अनेक नेते ठाकरे गट सोडून महायुतीत प्रवेश करत आहेत. आता या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचं नावही जोडलं जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे.
भाजपकडून सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाचे संपर्क मंत्री व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामीण आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ऋत्य मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील पाच दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या सणात पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये पावसाने आज दुपारी अचानक हजेरी लावली. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना ‘कापून टाकण्याची’ भाषा केली आहे. तसेच हा कार्यक्रम सुरू केला, तर सरकार गुडघ्यावर येईल. पण मरण्यापेक्षा लढणे सुरू करा, असेही बच्चू कडू म्हणाले. बुलढाण्यातील शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते.
सत्तेच्या वळचणीला राहून देखील काका पुतण्याच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पट्ट्यात पडझडच होत असल्याचे चित्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले. सोलापूर जिल्हा आणि नवी मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून गळती समोर आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक मूळ ओबीसींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या सर्व जागा कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आलेले मराठा समाजाचे उमेदवार घेऊन जातील. त्यामुळे त्यांच्या हाती काहीच उरणार नाही, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केली. वडेट्टीवार यांच्या या दाव्याने ओबीसी समुदायात एकच खळबळ माजली आहे.
ठाणे शहर आणि जिल्ह्यात भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्वबळाचे आव्हान द्यायचा प्रयत्न केला असता तरी एकनाथ शिंदे ठाण्यावरची पकड सहजासहजी निसटू देणार नाहीत याची चुणूक त्यांनी दिवाळी मिलनाच्या निमित्ताने दाखवून दिली. दिवाळीच्या सणात त्यांनी ठाण्यात ठाण मांडले असून दररोज विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. त्यातूनच शिंदे सेना इतरांना स्वबळाचा तडाखा द्यायच्या बेतात दिसत आहे.
शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याच्या भूमिकेवरही उद्विग्नता व्यक्त केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याच्या आरोपावर सत्ताधारी भाजपने जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण लागला आहे. त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी टीचभर तरी पुरावा द्यायला हवा होता, असे भाजपने म्हटले आहे.
अजितदादा तर भाजप समोर किस झाड की पत्ती आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला.
जत तालुक्यातील जनतेच्या कष्टातून उभारलेला राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या कारखान्याची दिवाळखोरी आणि पुढील विक्री हा विषय पुन्हा पेटला असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी जोरदार भूमिका घेत संघर्षाची हाक दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत भाजपवर आणि गुजरातसंबंधी धोरणांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी तयार केली जात आहेत. गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा भाजपला मतदान करणारा मराठी माणूससुद्धा त्यात भरडला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेच्या प्रश्नावर भावनिक इशारा दिला. राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.
पुण्यातील ऐतिहासिक वास्तू शनिवार वाड्याच्या आवारातील नमाज पठणावरून झालेल्या वादात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना थेट लक्ष्य केले आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या शनिवार वाड्याच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास, तिथे स्थानिक प्रशासन आहे. त्यामुळे ‘इतर कोणीही आपण सरकार आहोत, या थाटात वागू नये,’ असा सणसणीत टोला गोऱ्हे यांनी मेधा कुलकर्णी यांना लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचे आवाहन केले. इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असे उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणालेत.
राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘महा ई-ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ या नव्या प्रणालीअंतर्गत प्रशासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांच्या भौतिक सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन करण्यास सुरुवात करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व सेवाविषयक व्यवहार एकाच प्रणालीद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होतील.
पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ‘जैन बोर्डिंग होस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालेले असताना, आता धर्मादाय आयुक्तांनी पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत जे व्यवहार झाले, ते जैसे थे ठेवण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले असून, एचएनडी जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यात धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, विकासनगर, लेबर कॉलनी परिसरात आधुनिक आणि भव्य ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक व इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय’ उभारण्यासाठी ९२.९२ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ मसुद्यासंदर्भात सल्लागार समितीसह बैठक पार पडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, भारतीयांना त्यांच्या ज्ञान परंपरेला समजून घेण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी ‘मॅकॉले नॉलेज सिस्टीम’च्या परकीय प्रभावापासून पूर्णपणे मुक्त व्हावे लागेल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App