मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगर सभेला विरोध वाढल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून येत आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात आवाज बुलंद केल्यानंतर राज ठाकरेंनी “हिंदुत्वाची शाल पांघरली”, “भोंग्यांच्या राजकारणामुळे हिंदुत्व बदनामी होते आहे”, “मनसे ही भाजपची सी टीम”, “नवे हिंदुत्ववादी”, “नवे ओवैसी”, अशा शेलक्या शब्दांनी संजय राऊत रोज राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधत आहेत. राष्ट्रवादी शिवसेनेसह सर्व विरोधक राज ठाकरेंवर रोज तोंडसुख घेत आहेत. Raj Thackeray: “Aite Pracharak” of Sambhajinagar meeting; Opposition’s embezzlement or strengthening of MNS ??
आता त्याची पुढची पायरी म्हणून राज ठाकरे यांच्या संभाजीनगर मधल्या सभेला जोरदार विरोध सुरू झाला आहे. पण या विरोध करणाऱ्या संघटनांकडे एकदा नजर टाकली तर त्या मागचे नेमके इंगित लक्षात येईल. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, प्रहार संघटना, मौलाना आझाद विचार मंच, गब्बर ॲक्शन संघटना, ऑल इंडिया पॅंथर सेना या पाच संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. या संघटनांची मराठवाड्यातली ताकद नेमकी किती हा भाग अलहिदा आणि तो भाग जरी सोडून दिला तरी राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करून या संघटना मराठवाड्यात मनसेच्या संघटनेला खच्ची करताहेत की बळकटी देत आहेत…??, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही…!! कारण राज ठाकरे आणि मनसे जेवढा त्यांच्या संभाजीनगर च्या सभेचा प्रचार करताना दिसत नाहीत तेवढा अँटी प्रचार या संघटना राज ठाकरे यांच्या सभेचा करताना दिसत आहेत. त्यामुळे हा विरोध एक प्रकारे राज ठाकरे यांच्या सभेच्या यशाची जणू गॅरंटी ठरत आहेत…!!
राज ठाकरे हे दखलपात्र पक्षाचे प्रमुख ते सर्वाधिक दखलपात्र पक्षाचे प्रमुख हा गेल्या 15 दिवसातला राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास आहे…!! गुढीपाडव्यापासून आज पर्यंत म्हणजे 20 एप्रिल पर्यंत एकही दिवस असा गेला नाही, की ज्या दिवशी राज ठाकरे यांच्या कुठल्या भूमिकेवर विरोधकांनी शरसंधान साधले नाही!! पण हे करताना विरोधक अँटी का होईना पण त्यांचाच प्रचार करत आहेत. म्हणजे एक प्रकारे राज ठाकरे यांचा मनसेला राज्यांमध्ये रेलेव्हंट पक्ष म्हणून पुनरुज्जीवित करण्याचा जो मनसूबा आहे तो यशस्वी करण्यासाठी राज ठाकरे स्वतः आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपेक्षा विरोधकच धावताना दिसत आहेत…!!
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा घेतला. ठाण्यात उत्तर सभा घेतली. पुण्यात हनुमान चालीसा महाआरती केली आणि आता ते संभाजीनगरला येऊन सभा घेणार आहेत. पण यातून मनसे मध्ये संघटनात्मक पातळीवर काय फरक पडला…?? राज ठाकरे यांच्या सभा पूर्वीपासून “जंगी”, “हाऊसफुल्ल” वगैरे अशाच होत होत्या… तरी देखील राज ठाकरे विशिष्ट मर्यादेपलिकडे मनसेची संघटना वाढवू शकले नव्हते. पण आता विरोधक त्यांच्या संघटनेचा अँटी प्रचार करून स्वतःच मनसे संघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज ठाकरे यांच्या सभेला जेवढा विरोध होईल तेवढी त्यांची सभा इतरांच्या प्रयत्नातून यशस्वी होईल हे सांगायला फार मोठ्या राजकीय पंडितांची गरज नाही. महाराष्ट्रातली सत्ताधारी आणि महाराष्ट्रातले विरोधक एवढी प्रचंड फौज राज ठाकरे यांच्या मागे हात धुऊन लागली असेल तर त्यांची तोळामासा असलेली मनसे संघटना फोफावायला वेळ तो केवढासा लागणार…!!
अगदी राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेवर बंदी घातली तरी जे राज ठाकरे यांना साध्य करायचे आहे ते साध्य करण्यापासून आडकाठी कोण आणणार…?? आणि सभेचा अँटी प्रचार करून ते साध्य तरी कसे होणार…?? पण हे विरोधकांना सांगणार कोण आणि सांगितले तरी ऐकणार कोण…?? हा खरा प्रश्न आहे…!! राज ठाकरे यांना संभाजीनगरच्या सभेचा प्रचार करण्यासाठी “आयते प्रचारक” मिळालेत मग ते तरी धुवांधार बॅटिंग करायची थोडीच सोडतील…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App