महाराष्ट्र की बंदूकराष्ट्र??; शहाजोग माध्यमांनी केलाय प्रश्न; पण माध्यमे का लपवत आहेत यातला राष्ट्रवादीचा संबंध??, असा प्रश्न विचारायची वेळ मराठी माध्यमांनीच त्यांच्या पक्षपाती रिपोर्टिंगमधून आणली आहे. Marathi media selectively questioned law and order in maharashtra, but avoided targeting real cause the NCP factor
महाराष्ट्रात बीड, बारामती, नाशिक मध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनांचा संबंध माध्यमांनी महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेशी लावला. महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना राज्यात कसा बिहारसारखा धुमाकूळ सुरू आहे, याचे सविस्तर वर्णन माध्यमांनी चालविले. पण या “पवार बुद्धी”च्या माध्यमांना या गोळीबाराच्या घटनांमध्ये कुठल्या ना कुठल्या राष्ट्रवादीचाच संबंध आहे, हे मात्र दिसेनासे झाले. बीड आणि बारामती मधल्या गोळीबारामध्ये राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते गुंतलेत, मग ते पवारांचे असोत, की अजितदादांचे. गोळीबार करणारे आणि गोळीबारात जीव गमावणारे हे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत. याचा उल्लेख माध्यमांनी एकतर केला नाही किंवा केला असल्यास तो बातम्यांमध्ये तळात केला. यातच “पवार बुद्धी”च्या माध्यमांची पक्षपाती भूमिका दिसून आली.
बिहारप्रमाणे महाराष्ट्रात बंदुकराज सुरू आहे का??, असा प्रश्न पडतो आणि त्याला कारण म्हणजे गेल्या 48 तासांत झालेल्या गोळीबाराच्या तीन घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. गोळीबाराची कारणं जरी वेगवेगळी असली तरी राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का??, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे वेळीच या घटना रोखल्या नाहीत, तर महाराष्ट्राची ओळख बंदुकराष्ट्र झाल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी मखलाशी मराठी माध्यमांनी चालवली आहे.
बीडमध्ये पॉलिटिकल फायरिंग
गोळीबाराची पहिली घटना घडली ती राजकीयदृष्ट्या तापलेला जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडमध्ये. परळीच्या बँक कॉलनी परिसरात हा गोळीबार झाला. त्यात मरळवाडीचे सरंपच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला, तर नंदागौळ येथील ग्यानबा मरोती गीते आणि महादेव गीते हे गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बबन गीते यांनी या दोघांना महादेव गीते यांच्या घरी बोलवून हा गोळीबार केला. हा उल्लेख माध्यमांनी बातम्यांचा तळात केला आहे. यातले मृत्यू झालेले सरपंच अजित पवार गटाचे आहेत.
बबन गीते यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करताना 700 गाड्यांचा ताफा नेत जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचीही जोरदार चर्चा रंगली होती, तर ग्यानबा गीते यांनी अजित पवारांच्या पक्षात गटात प्रवेश केला होता. त्यानंतर बीड मधली गोळीबाराची घटना घडली.
नाशकात जल्लोषाची मस्ती
नाशकात जल्लोषाची मस्ती काय असते त्याचं विदारक दर्शन महाराष्ट्राला झाले. भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आनंदाच्या भरात दोन गट रस्त्यावर उतरले आणि त्यांच्यात झालेल्या राड्यात कोयते नाचवत गोळीबार झाला. या घटनेत एकाच्या पायाला गोळी लागली, तर 5 जण जखमी झाले.
बैलाच्या व्यवहारातून बारामतीत गोळीबार
तिसरीकडे बारामतीत घडलेल्यास घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. निंबुत येथे गौतम काकडे याने बैलाच्या व्यवहारातून केलेल्या गोळीबारात रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडेला अटक झाली. तर फरार झालेल्या गौतम काकडेचा शोध सुरू झाला.
शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून काकडे आणि निंबाळकर यांच्यात वाद झाला होता. 1 वर्षांपूर्वी निंबाळकर यांनी काकडेकडून 61 लाखांना बैल खरेदी केला. जूनमध्ये निंबाळकर यांचा बैल काकडेने 37 लाखांना विकत घेतला. इसार म्हणून 5 लाख दिले, उरलेल्या 32 लाखांवरून वाद आणि गोळीबार झाला आणि निंबाळकरांचा मृत्यू झाला.
या सगळ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. पण यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध मात्र लपवून ठेवत गृहमंत्री म्हणून थेट देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधले. जणू काही त्यांच्या नेतृत्वाखालच्या गृह मंत्रालयाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाही, असे नॅरेटिव्ह तयार करण्याचा यातून प्रयत्न केला. बारामती असो, वा बीड. तिथे तर गोळीबाराशी थेट पवारांच्याच राष्ट्रवादीचा संबंध आहे. मग हा प्रश्न फक्त महाराष्ट्र की बंदूकराष्ट्र??, एवढा पुरता मर्यादित उरतो का?? त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी दोन्ही राष्ट्रवादींची नाही का??, हा कळीचा सवाल तयार होतो. मात्र “पवार बुद्धी”च्या मराठी माध्यमांनी हा सवाल विचारलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App