राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पवारांच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण भरले. त्या उत्साही वातावरणातच मोठ-मोठी फोटोसेशन करून पवारांनी रायगडावर जाऊन तुतारी चिन्हाचे अनावरण केले. आत्तापर्यंत पवारांना मिळालेल्या विविध निवडणूक चिन्हांचे अनावरण पवारांनी कधीच कुठल्या गडावर जाऊन केले नव्हते, पण “तुतारी” सारखे रणवाद्य हे चिन्ह पक्षाला मिळाल्याबरोबर पवारांना तब्बल 40 वर्षांनी रायगड आठवला आणि ते डोलीतून रायगड “सर करून” कार्यक्रम स्थळी गेले. तिथे त्यांनी तुताऱ्यांच्या गजरात स्वतःच्या पक्षाच्या “तुतारी” चिन्हाचे अनावरण केले. Many political leaders making fun of Sharad pawar’s NCP’s election symbol Trumpet
पण शरद पवारांना मिळालेल्या तुतारी निवडणूक चिन्हाची जेवढी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सुरू आहे, तेवढी चर्चा पवारांच्या राजकीय आयुष्यात बाकी कुठल्याच चिन्हावर झाली असल्याचे इतिहास सांगत नाही.
पवारांनी स्वतःच सांगितल्याप्रमाणे ते बैलजोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा आणि घड्याळ या चिन्हांवर वेगवेगळ्या निवडणुका लढले. ते स्वतः निवडून आले आणि आपल्या निवडक समर्थकांनाही त्यांनी निवडून आणले. पण शरद पवारांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हाएवढी कुठल्याच चिन्हावर कधीच चर्चा झाली नव्हती, ती आत्ता सोशल मीडियावर सुरू आहे. किंबहुना ती केवळ चर्चेच्या पातळीवर उरलेली नसून पवारांच्या तुतारी चिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडविण्यात येत आहे. पवारांचे समर्थक सोडून बाकी सगळेच नेते आणि कार्यकर्ते तुतारी चिन्हावरून सोशल मीडियात पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना डिवचत आहेत.
सोशल मीडिया नव्हता, तेव्हा पक्षाचे निवडणूक चिन्ह पोचवायला हाताशी कार्यकर्ते लागत. गावागावांमध्ये त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते पसरलेले असत. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह बदलले, तरी ते सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविणे हे काँग्रेसच्या नेत्यांसाठी फार मोठे आव्हान ठरत नसे. उलट त्या वेळच्या सर्व विरोधी पक्षांना मात्र स्वतःची चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत आणि अनेकदा ते चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचतही नसे. त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊन काँग्रेसचा प्रचंड विजय होत असे. या सगळ्याचा लाभ पवारांना काँग्रेसनिष्ठ पक्षाशी संलग्न राहून घेता आला. त्यामुळे त्यांच्या नियमित टप्प्यांवर बदललेल्या चिन्हांची कधीच फारशी चर्चा झाली नाही.
पवारांनी 1980 च्या दशकात चरखा चिन्हावर निवडणूक लढवली आणि 1999 नंतर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली, तेव्हा देखील पवारांच्या राजकारणावर चर्चा झाली, पण निवडणूक चिन्हावर मात्र तेवढी चर्चा झालेली नव्हती. त्याउलट पवारांचा पक्ष फोडून अजितदादांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याबरोबर नेल्यानंतर पवारांच्या उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह मिळाल्यानंतर मात्र सोशल मीडिया चर्चेने जोर पकडला आहे आणि तो पवारांच्या थेट ताकदीशी संबंधित आहे.
तुतारी हे चिन्ह रणवाद्य आहे हे खरे, पण पवारांना ते अशा वयात मिळाले आहे, की जे फुंकणे आणि त्यातून रणांगणात विजय मिळवणे हे जवळपास अशक्य आहे. कारण पवारांबरोबर असलेली फौज आता मूळातच फार कमी झाली आहे. त्यांचे “इलेक्टिव्ह मेरिट” असलेले सगळे नेते अजित पवारांबरोबर निघून गेले आहेत. त्यामुळे उरलेल्या फौजेतली भरती पवारांना केवळ मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनातून करवून घ्यावी लागणार आहे. ही भरती महाराष्ट्रात राजकीय वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि आपल्याच समर्थक माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी उपयोगी असली, तरी प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी ठरेलच, अशी कुठलीही गॅरंटी पवारांकडे नाही!!
त्यामुळे पवारांना त्यांच्या वयाच्या 84 व्या वर्षी निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह बहाल केले असले, तरी ती तुतारी फुंकणारे आणि त्यातून निवडणुकीच्या यशाची रणदुंदुभी वाजवणारे नेते तयारच होतील याची कुठलीही खात्री नाही. या अर्थाने तुतारी हे निवडणूक चिन्ह शरद पवारांसाठी दुधारी राजकीय शस्त्र बनले आहे. कारण पवारांचे उमेदवार तुतारी फुंकून विजयी झाले, तर ठीकच, नाहीतर “फुंकली तुतारी आणि वाजली पिपाणी” हे होण्याची दाट शक्यता आहे!!
पवारांना तुतारी हे चिन्ह त्यांच्या ऐन उमेदीच्या राजकीय काळात मिळाले असते, तर कदाचित त्या चिन्हाच्या नैसर्गिक अधिकारानुसार ते त्याला त्यांच्या वकूबानुसार मर्यादित न्यायही देऊ शकले असते. कारण रणवाद्य हे विजयासाठी वाजवले जाते, न की पराभवासाठी!! त्यामुळे पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांनी तुतारी वाजवली आणि तरीही महायुतीचाच विजय झाला, तर वर उल्लेख केल्याप्रमाणे “फुंकली तुतारी आणि वाजली पिपाणी” हेच पवारांना बघावे लागण्याची दाट शक्यता आहे.
पवारांच्या पक्षाची विजयी तुतारी वाजवण्याची क्षमता असलेल्या दुसऱ्या – तिसऱ्या फळीतल्या नेतृत्वाचा अभाव ही देखील पवारांच्या सध्याच्या राजकारणाची फार मोठी उणीव आहे. म्हणूनच तर वयाच्या 84 व्या वर्षी पवारांना स्वतःलाच ती तुतारी हातात घेऊन फुंकण्याची वेळ आली आहे. पण ती तुतारी फुंकून आपल्या पक्षाच्या शिडामध्ये विजयाची हवा भरणे फार कठीण आहे. कारण खरंच त्यासाठीचे पवारांचे वय आता निघून गेले आहे. पवारांना मिळालेले तुतारी चिन्ह अस्थानी आणि अवेळी मिळाले आहे हेच यातून स्पष्ट होते!!
(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App