नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेटवर ठेवलेल्या मनोज जरांगे यांनी आपली तोफ काँग्रेसकडे वळविली, पण त्यामुळेच पक्षाच्या पुनरुज्जीवनाची आशा पल्लवीत झाली!! मनोज जरांगे यांच्या राजकारणाच्या नव्या वळणाने असं म्हणायची वेळ आली. Manoj jarange
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कायमच फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. त्यांनी अगदी असभ्य भाषेत फडणवीसांवर टीका केली. त्यामुळे त्यांचे समर्थक चेकाळून फडणवीस यांच्या पत्नी संदर्भात सुद्धा असभ्य आणि अश्लाघ्य बोलून गेले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत मराठा समाजाला आरक्षण दिले त्याच्या पाठपुरावा केला, तरी केवळ शरद पवारांच्या चिथावणीतून मनोज जरांगे हे फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करत राहिले. त्यांच्या पाठोपाठ त्यांनी ओबीसी नेते त्यांच्या पाठोपाठ छगन भुजबळ यांना टार्गेट केले. अधून मधून ते विजय वडेट्टीवारांना टार्गेट करत राहिले. Manoj jarange
– राहुल गांधी टार्गेटवर
परंतु फडणवीस सरकारने मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याचा जीआर काढताच मनोज जरांगे यांनी आपली तोफ फक्त ओबीसी नेत्यांकडे वळविली. त्यातही काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी जास्त टार्गेट केले. मनोज जरांगे आत्तापर्यंत राहुल गांधी किंवा केंद्रीय नेत्यांची नावे घेत नव्हते. परंतु “दिल्लीचा लाल्या” म्हणून जरांगेंनी राहुल गांधींना टार्गेट करायला सुरुवात केली. ओबीसी समाजाच्या नागपूरच्या मोर्चाच्या मागे राहुल गांधी आहेत, असा आरोप आज केला.
विखे पाटलांची भेट
या दरम्यानच्या काळात त्यांना राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भेटून गेले होते. दोघांची अंतरवाली सराटीत बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी समाजाने मोर्चा काढू नये शासनाचा जीआर मान्य करावा, असे आवाहन केले होते. तरी देखील नागपुरात विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचा मोर्चा काढायचा तो काढलाच. त्यामुळे मनोज जरांगे यांनी वडेट्टीवार यांच्याबरोबरच राहुल गांधींना टार्गेट केले.
– देवेंद्र फडणवीसांना लाभच
पण आत्तापर्यंतचा राजकीय अनुभव लक्षात घेता मनोज जरांगे यांनी ज्यांना टार्गेट केले, त्यांचे फार मोठे नुकसान होण्या ऐवजी मोठा राजकीय फायदा झाल्याचेच चित्र महाराष्ट्रात दिसले होते. शरद पवारांच्या चिथावणीखोरी मधून मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून पाहिले. परंतु फडणवीस यांनी आपल्या चतुर खेळ्यांनी मनोज जरांगे यांनी आपल्याला टार्गेट केल्याचा राजकीय फायदा व्यवस्थित उचलला. जरांगेंना त्यांनी कुठल्याही असभ्य भाषेत प्रत्युत्तरे दिली नाहीत. त्या उलट ते राजकीय कृती व्यवस्थित करत राहिले. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंचा उत्तम मुकाबला केला. जरांगेंचे राजकीय प्रस्थ फारसे वाढू दिले नाही. उलट ज्या शरद पवारांनी जरांगेंना उकसवले, त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मनोज जरांगे यांचाच राजकीय फटका बसला. मनोज जरांगे यांनी शरद पवार सोडून बाकी सगळ्या नेत्यांना टार्गेट करून बघितले परंतु त्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा झाल्याचे दिसले नाही. फक्त मराठी माध्यमांमध्ये बातम्यांपुरते शरद पवारांचे राजकीय बळ महाराष्ट्राला दिसले.
– काँग्रेसची आशा पल्लवीत
याचा अर्थ मनोज जरांगे यांनी कितीही धमक्या दिल्या तरी त्यांना कुठल्याही राजकीय व्यक्तीची कारकीर्द संपवता आल्याचे अजून तरी दिसले नाही. देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे निवडणुका जिंकले. मनोज जरांगे यांनी ज्यांना टार्गेट केले ज्यांची नावे घेऊन सतत टीकास्त्र सोडले, त्या व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहिल्या. किंबहुना नंतर वाढल्या, हेच चित्र महाराष्ट्राने पाहिले. आता मनोज जरांगे यांनी आपली तोफ काँग्रेस आणि राहुल गांधींकडे वळविली म्हणूनच काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची आशा पल्लवीत झाली, असे म्हणायला हरकत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App