नाशिक : वडीलकीच्या नात्याने सांभाळून घेण्याची दिलदारी, पण प्रसंगी कानउघाडणीचीही तयारी!!, हे महाराष्ट्राच्या महायुतीतले सूत्र तयार करून अमित शाह दिल्लीला गेले आहेत. महाराष्ट्राच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात अमित शहा यांनी जळगाव आणि छत्रपती संभाजी नगर मधून भाजप आणि महायुतीच्या प्रचाराचा हुंकार भरला, पण मुंबईत येऊन महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांना “प्रॅक्टिकल अप्रोच” ठेवून जागावाटप करण्याचा परखड सल्ला दिला. यातून अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना तुम्ही मोदी – शाह यांच्या भाजपची “डील” करताय, काँग्रेसशी नव्हे, असा स्पष्ट संदेश दिला!!
याचा अर्थच भाजपशी शिंदे आणि अजितदादांना स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर वाटाघाटी करता येणार नाहीत, तर भाजप स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर त्यांना वडीलकीच्या नात्याने सांभाळून घेईल आणि प्रसंगी कानउघडणी देखील करेल हेच अमित शाहांनी आपल्या “सुप्त” संदेशात “स्पष्ट” नमूद केले. त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याची बातमी समोर आली आहे.
आत्तापर्यंत एकनाथ शिंदे हे दोन पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चेमध्ये पहिल्या खुर्च्यांवर बसलेले नसायचे. कारण अखंड शिवसेनेत त्यांना मर्यादित अधिकार होते. किंबहुना अधिकारच नव्हते, पण अजित पवारांचे तसे नव्हते. शरद पवार जरी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीत प्रमुख नेते होते, तरी एकूणच पवार काका – पुतणे महाराष्ट्रातल्या काँग्रेसवर “दादागिरी” करण्यात माहीर होते. अनेकदा पवार काका – पुतणे स्वतःच्या टर्म्स अंड कंडिशन्सवर महाराष्ट्रातल्या काँग्रेसला “वाकवून” त्यांच्याशी जागा वाटपाच्या वाटाघाटी करत असत. शरद पवार राजकीय दबाव आणत असत, तर अजितदादा प्रशासकीय पातळीवरून काँग्रेसवर “गेम” टाकत असत.
पण आता ती परिस्थिती महाराष्ट्रात उरलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांचा भाजपवर “मोदी मैत्रीपूर्ण” देखील दबाव उरलेला नाही, तर अजितदादांचा “प्रशासकीय प्रभाव” हा देवेंद्र फडणवीस यांच्या “नियंत्रणाखाली” आला आहे. त्यामुळे अजितदादा स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर भाजपशी कुठले “डील” करू शकतील ही शक्यताच फार दुरापास्त आहे. त्यामुळेच अमित शाह यांनी शिंदे आणि अजितदादांना “प्रॅक्टिकल अप्रोच” ठेवून जागावाटप करण्याचा सल्ला दिला आहे.
शिंदे – अजितदादांनाच खरी गरज!!
जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करूनच अमित शाह मुंबईतून दिल्लीला गेले आहेत. तो अजून जाहीर झालेला नाही, पण भाजप 30 + आणि उरलेल्या 18 मध्ये शिंदे, अजितदादांच्या पक्षांचे उमेदवार लढतील. त्यातही त्यांचे काही उमेदवार कमळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यात मतदारसंघांची अदलाबदल करून यातला एखाद दुसरा आकडा इकडे तिकडे होऊ शकेल, पण मूलभूत सूत्र मात्र बिलकुलच इकडे तिकडे हलणार नाही आणि ते सूत्र हेच असेल की, भाजप मोठ्या भावाच्या नव्हे, तर वडीलकीच्या नात्याने शिंदे – अजितदादांना जरूर सांभाळून घेईल, पण प्रसंगी कानउघडणी करायलाही मागे पुढे पाहणार नाही. कारण महायुती ही फक्त भाजपची गरज नाही, तर शिंदे – अजितदादांची अधिक गरज आहे ही वस्तुस्थिती यातून अधोरेखित होत आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App