नाशिक : भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून अजितदादा करताहेत गेमा; वेळीच सावध व्हा!!, असं म्हणायची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजकीय करतुतीने आली.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला यायचे. सत्तेचे सगळे मनसोक्त उपभोग घ्यायचे. पण मनापासून भाजपला साथ द्यायची नाही ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुरुवातीपासूनचे रणनीती राहिली. तिचेच प्रत्यंतर गेल्या दोन दिवसांत अधिक प्रकर्षाने आले.
बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातली घोषणा केली. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कायमचे सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना काय करता येईल. यासंदर्भात समिती नेमायची देखील घोषणा केली. बच्चू कडू यांचे आंदोलन त्यामुळे थांबले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळून शेतकरी कर्जमाफी विषयी अनुकूल मत व्यक्त केले.
अजित पवारांचा वेगळा सूर
पण नेमके त्याचवेळी बारामतीत बोलताना अजित पवारांनी वेगळा सूर लावला. शेतकऱ्यांना सगळं कसं फुकटात द्यायचं नेहमीच त्यांना कसं फुकटात हवं त्यांनी 0 % व्याजाने कर्ज मिळाले, तर ते वेळेत फेडायचे स्वतःहून सवय लावायला हवी, असे वक्तव्य केले. पण एवढेच बोलून ते थांबले नाहीत. एकदा शरद पवारांनी कर्जमाफी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी नंतर कर्जमाफी केली. उद्धव ठाकरे सरकारमध्ये आम्ही सुद्धा कर्जमाफी दिली पण वारंवार कर्जमाफी कशी द्यायची??, असा सवाल त्यांनी केला. आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने अजित पवारांचे वक्तव्य योग्य होते. पण त्याचे political timing मात्र मुद्दामून त्यांनी चुकीचे निवडले. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. राजू शेट्टी आणि रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना फडणवीस सरकारला सुद्धा गेले तुमची औकात नव्हती, तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केलीस कशाला??, असा सवाल त्यांनी फडणवीस सरकारला केला. अजित पवारांनी बारामतीत शेतकरी कर्जमाफी वर प्रतिकूल मत व्यक्त केले नसते तर राजू शेट्टी आणि रोहित पवारांना फडणवीस सरकारला घेरण्याची संधी मिळाली नसती. अजित पवारांनी मुद्दामून शेतकरी कर्जमाफी वर प्रतिकूल मत व्यक्त करून ती संधी विरोधकांना मिळवून दिली.
हसन मुश्रीफ आघाडीला अनुकूल
पण हे सगळे प्रकरण इथेच थांबले नाही. आज जेव्हा महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष आणि राज ठाकरे यांची मनसे मतचोरी विरोधात मुंबईत मोर्चा काढत आहेत त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ पुढे आले आणि त्यांनी महाविकास आघाडीला अनुकूल ठरणारे वक्तव्य केले. मतदार याद्यांचे शुद्धीकरण पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत, अशी आग्रही भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि विशेषत: ठाकरे बंधूंनी घेतली. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याच सुरात सूर मिसळला. सदोष मतदार याद्यांवर निवडणूक घ्यायला आमचाही आक्षेप आहे, असे ते म्हणाले. पण आपण व्यक्त केलेले मत महायुतीच्याच विरोधात जाते हे लक्षात आल्याबरोबर मुश्रीफ फिरले आणि महाविकास आघाडीला सध्या पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला विरोध आहे, अशी मखलाशी त्यांनी केली.
वर दिलेल्या दोन्ही उदाहरणांवरून हेच स्पष्ट दिसून आले की भाजपच्या सत्तेच्या वळचणीला यायचे. सत्तेचे सगळे उपभोग घ्यायचे, पण भाजपच्या सरकारच्या धोरणांना मनापासून साथ द्यायची नाही. शक्य तिथे काड्या घालत राहायचे, ही रणनीती अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चालू ठेवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App