काँग्रेसचे निष्नेहरुकरण : अर्थात राहुलजीच घेताहेत नेहरू विरोधी भूमिका!!


विशेष प्रतिनिधी

काँग्रेसचे निष्नेहरूकरण!!… शब्द थोडा अवघड आहे. पण हीच वस्तुस्थिती आहे. काँग्रेस ज्या नेहरू मार्गाने पुढे वाटचाल करत होती, तिला 2014 नंतर अवरोध उत्पन्न झाल्यानंतर काँग्रेसनेच नेहरू मार्गापासून स्वतःला अलग करून घेतले आहे. हेच काँग्रेसचे निष्नेहरुकरण आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या राजकीय धर्मनिष्ठ वर्तन व्यवहाराकडे बारकाईने पाहिले, तर काँग्रेस स्वतःला निधर्मी नेहरू मार्गापासून दूर नेत आहे हेच दिसून येत आहे. Rahul Gandhi deviating Congress from Nehruivian path by performing puja and abhishek, religious rituals

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या सुरुवातीला केरळ आणि तामिळनाडूमध्ये मशिदी आणि चर्चेसना भेटी दिल्या. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मगुरूंशी चर्चा केली. त्यावेळी राहुल गांधींवर जास्त टीका झाली. काँग्रेसने घेतलेला फीडबॅक प्रतिकूल असल्याचे स्पष्ट झाले आणि राहुल गांधींनी आपला राजकीय वर्तन व्यवहार बदलला. भारत जोडो यात्रा केरळ आणि तामिळनाडूतून उत्तरेकडे सरकल्यानंतर कर्नाटक आणि तेलंगण मध्ये राहुल गांधींनी विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. त्या राज्यांमधल्या काही मठाधिपतींशी चर्चा केली. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर काँग्रेसने आणि त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून व्हायरल केले. नांदेडमध्ये त्यांनी गुरुद्वारात जाऊन पाठ केला आणि आता मध्य प्रदेशात तर त्यांनी आपल्या राजकीय धर्मनिष्ठ वर्तन व्यवहाराचा कळस गाठला आहे. त्यांनी ओंकाराची शाल ओढून नर्मदातटावर ध्यान लावले आणि उज्जैन मध्ये महांकालेश्वर मंदिरात जाऊन सोवळे नेसून रुद्राभिषेक केला. राहुल गांधींच्या या वर्तन व्यवहारातूनच काँग्रेस नेहरू मार्गापासून दूर गेल्याचे स्पष्ट होत आहे.

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपले सर्व धार्मिक व्यवहार सार्वजनिक नव्हे, तर खाजगी पातळीवर ठेवले होते. कोणत्याही धार्मिक कृत्याला नेहरू सरकारचा पाठिंबा नव्हता. ज्यावेळी सोमनाथच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा पुढे आला, त्याला पंडित नेहरूंनी विरोध केला होता. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी जाहीर गळ त्यांनी राजेंद्र प्रसादांना घातली होती. परंतु, राजेंद्र प्रसाद यांनी त्यावेळी पंतप्रधान पंडित नेहरूंचे ऐकले नव्हते. ते सोमनाथच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाला गेले होते. ते नुसते कार्यक्रमाला गेले नाहीत, तर त्या धर्मकृत्याचे ते यजमान बनले.

तिथे सर्व पूजा अर्चा, प्राणप्रतिष्ठा सोवळ्यात केली. सोमनाथच्या जीर्णोद्धाराचे पौरोहित्य रॉयवादी असलेले परंतु आपले सर्व धार्मिक शिक्षण पारंपारिक वैदिक पाठशाळेत घेतलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले होते. हा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. कारण सोमनाथच्या जीर्णोद्धाराच्या मुद्द्यावर या सर्वांचा दृष्टिकोन राष्ट्रीय पुनरुत्थानाचा होता. तो केवळ धार्मिक नव्हता. परंतु तरी देखील पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्याला विरोध केला होता ही वस्तुस्थिती आहे.

अशा पंडित नेहरूंचे पणतू राहुल गांधी हे जेव्हा नर्मदा तटी ओंकाराची शाल ओढून ध्यानस्थ बसतात, उज्जैनच्या महांकालेश्वर मंदिरात जाऊन सोवळे नेसून पूजा अर्चा आणि रुद्राभिषेक करतात, त्यावेळी ते काँग्रेसला एक प्रकारे नेहरू मार्गापासून दूर नेतात आणि हेच काँग्रेसचे निष्नेहरूकरण आहे.

काँग्रेसचे सर्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजप नेत्यांवर देशाला नेहरू मार्गापासून दूर नेल्याचा आरोप करत असतात. नेहरूंचा निधर्मी मार्ग मोदी सरकारने सोडला, अशी टीका करत असतात. भाजपचे नेते नेहरूंची बदनामी करतात म्हणून काँग्रेसचे नेते सावरकरांची बदनामी करतात. इतकेच नाही, तर जयराम रमेश यांच्यासारखे उच्चशिक्षित प्रवक्ते देखील तुम्ही नेहरूंविषयी खोटे बोलायचे बंद करा. आम्ही तुमचे नेते सावरकरांविषयी खरे बोलायचे बंद करू, असे प्रतिआव्हान देतात. म्हणजे नेहरूंची त्यांच्या राजकीय चुकांसकट सर्व बाजूंनी पाठराखण करतात. असे असताना नेहरूंनी जे निधर्मी धोरण अवलंबले होते, त्याच्या विरोधी वर्तन करताना राहुल गांधी दिसतात. हे नेहरू हे काँग्रेसचे निष्नेहरूकरण आहे. याबद्दल काँग्रेसचे नेते आरोप भाजपवर करतात, पण प्रत्यक्ष राजकीय धर्मनिष्ठ कृती मात्र राहुल गांधी करताना दिसतात.

Rahul Gandhi deviating Congress from Nehruivian path by performing puja and abhishek, religious rituals

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात