“पालघरची भळभळती जखम”


पालघर जिल्ह्यातील#गडचिंचले येथे गेल्या वर्षी जमावाच्या हल्ल्याला बळी पडलेल्या कल्पवृक्षगिरी महाराज व सुशिलगिरी महाराज यांचा १६ एप्रिलला पहिला स्मृती दिवस. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात प्रवास करत असताना रात्रीच्या वेळी चुकून गडचिंचले गावात गेलेल्या या दोघा साधूंची निलेश तेलगडे या त्यांच्या वाहनचालकासह जमावाने निर्घृण हत्त्या केली होती. दोन साधूंचे अशा भयानक पद्धतीने ‘#मॉबलिंचिंग’ केले गेल्याने समाजमन हळहळले होते. हिंदू समाज, हिंदू प्रतिके, हिंदू आस्था-परंपरा यांच्या विरोधात ‘वाम’मार्गी संघटना, एनजीओज आणि खिश्चन मिशनऱ्यांचा जो विकृत प्रचार गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे त्याचा दृष्य परिणाम म्हणजे गडचिंचलेची ही घटना होती. Palghar mob lynching, a year after… Justice yet to come!!


महेश काळे

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे गेल्या वर्षी जमावाच्या हल्ल्याला बळी पडलेल्या कल्पवृक्षगिरी महाराज व सुशिलगिरी महाराज यांचा १६ एप्रिलला पहिला स्मृती दिवस. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात प्रवास करत असताना रात्रीच्या वेळी चुकून गडचिंचले गावात गेलेल्या या दोघा साधूंची निलेश तेलगडे या त्यांच्या वाहनचालकासह जमावाने निर्घृण हत्त्या केली होती. दोन साधूंचे अशा भयानक पद्धतीने ‘#मॉबलिंचिंग’ केले गेल्याने समाजमन हळहळले होते. हिंदू समाज, हिंदू प्रतिके, हिंदू आस्था-परंपरा यांच्या विरोधात ‘वाम’मार्गी संघटना, एनजीओज आणि खिश्चन मिशनऱ्यांचा जो विकृत प्रचार गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे त्याचा दृष्य परिणाम म्हणजे गडचिंचलेची ही घटना होती.

या घटनेच्या निमित्ताने डाव्या संघटना, खिश्चन मिशनरीज व त्यांच्या शेतीसाठी जमिनीची मशागत करून देणऱ्या काही एनजीओज यांची समाजविघातक मानसिकता, त्यांची कार्यपद्धती व त्यांचे अत्यंत खालच्या स्तरावरचे राजकारण याचे दर्शन संपूर्ण देशाने घेतले होते. थोडेसे कटू वाटत असले तरी एक वास्तव असे होते की, मारणारे आणि मरणारे #हिंदू होते.

हत्या जर कुणा ‘…प्रिय’ व्यक्तिची झाली असती तर…? त्यांच्या अंगावर भगव्याच्या ऐवजी आणखी कुठल्या रंगाची वस्त्रे असती तर …?

बापरे बाप..!

कोरोनाकाळातही वर्षभर या मेणबत्ती ब्रिगेडने अक्षरश: देशभरात हैदोस घातला असता. १६एप्रिलला ‘राष्ट्रीय शोक दिवस’ साजरा करण्यापासून या ब्रिगेडने गडचिंचले येथे मेणबत्त्यांचा अक्षरश: खच पाडला असता. पण त्यांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा देशाच्या सुदैवाने म्हणा, ज्यांची हत्या झाली, ते निघाले गरिब बिच्चारे, निप्पाप, नि:शस्त्र, पापभिरू आणि ते देखील वाट चुकलेले ‘हिंदू’ #साधू!

‘स्वधर्मे निधनं श्रेय:’ हा गीतेतील उपदेशाचा प्रसार करण्यासाठी ज्यांनी भगवी वस्त्रे धारण करून हिंदू धर्माचे कार्य करण्यासाठी साधूचे जीवन अंगिकारले होते. मात्र आपली ही भगवी वस्त्रेच आपला घात करणार आहेत आणि आपल्या स्वबांधवांकडूनच आपला मृत्यु अटळ आहे, याची त्यांना बिलकुलच कल्पना नसणार. अर्थात कल्पना आली असती तरी ‘जैसी भगवान की इच्छा’ असे म्हणून त्यांनी मृत्यू देखील सहजपणे स्विकारला असण्याची शक्यताच अधिक होती…

असे हे दोन साधू!

आणि मारणारे?

ती तर बिचारी भोळीभाबडी, वनात, डोंगरकपाऱ्यात राहणारी सर्वसामान्य जनता. ज्यांना ‘आपलं’ म्हणतील, त्यांना कुठल्याही परिस्थितीत अंतर न देणारे हे एक वेगळेच रसायन परमेश्वराने #वनवासी_आदिवासी बांधवांच्या रूपाने तयार केले आहे. ‘आपल्या दादा’ करिता वाट्टेल ते करण्यासाठी मागे पुढे न पाहणारी गडचिंचले येथील निष्पाप अशी ही मंडळी. गडचिंचले गावातील काही जणांच्या जमावाने गेल्या वर्षी १६एप्रिलला या साधूंची गाडी अडवून त्यांना २तास वेठीस धरून ठेवले, हे जरी खरे असले तरी त्यांनी ठार मारण्याचा विचार दूरच, पण मारहाण करण्याचे धाडस सुद्धा दाखवले नव्हते.

मात्र एका राजकीय पक्षाचा ‘दादा’ आला आणि त्या दोन साधू व त्यांच्या गाडीच्या चालकाच्या ‘डेथ वॉरंट’वर स्वाक्षरी झाली असे म्हणावे लागेल. या जमावाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता व परिणामाची तमा न बाळगता उपस्थित असलेल्या पोलिसांच्या तावडीतून या तिघांनाही ताब्यात घेऊन पोलिसांच्या समोरच टेमके मारून त्यांची हत्या केली.

दोन दिवसानंतर या अमानुष अशा घटनेचे व्हिडिओ जेंव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले, तेव्हा लोक अक्षरश: हळहळले. निसर्गाच्या सानिध्यात राहणारा, मुक्या प्राण्यांनाही माणसापेक्षाही अधिक जीव लावणारा जनजाती माणूस एवढा अमानुष, क्रूर होऊ शकतो, यावर लोकांना प्रत्यक्ष व्हिडिओ पाहूनदेखील विश्वास ठेवणे अशक्य झाले.

खरे सांगायचे तर १६एप्रिलच्या रात्री गडचिंचले येथे एकंदरीत पाच हत्या झाल्या. त्यातील तीन हत्या मनुष्यांच्या होत्या. त्यादिवशी चौथा खून पडला तो कायदा आणि सुव्यवस्थेचा ! जमावाच्या तावडीत सापडल्यानंतर उशीरा का होईना, पण हल्लेखोरांनी उभे केलेले अडथळे पार करत घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यामुळे पाोलिसांच्या ताब्यात सुरक्षित असल्याने नि:श्वास सोडलेल्या साधूंना जमावाने प्रत्यक्ष पोलिसांच्या तावडीतून सोडवून घेतले. ज्या पद्धतीने तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी #स्वामी_कल्पवृक्षगिरी महाराजांना जमावाच्या हवाली केले ते सर्वात धक्कादायक होते. झुंडशाहीसमोर या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती हतबल होते याचे दर्शन त्यारात्री गडचिंचले येथे झाले. त्या दिवशी जमाव संतप्त होता, हे जरी खरे असले तरी पोलिसांचे काही प्रमाणात नियंत्रण तरी होते. मात्र ‘दादा’ आला आणि त्याच्या येण्याने जोशात आलेल्या जमावाचा उत्साह आणखीनच वाढला. त्या उत्साहातूनच त्यांनी पोलिसांच्या तावडीतून महाराजांना सोडवून त्याच पोलिसांच्या समोर त्यांची हत्या केली. जमावापुढे हतबल होऊन पोलिसच आपल्या ताब्यातील व्यक्तिंना जमावाच्या ताब्यात देतात हे अलीकडच्या काळातील कदाचित एकमेव उदाहरण त्यादिवशी दिसले.

मात्र एवढे सगळे करून सवरून हा ‘दादा’ आजही उघड माथ्याने फिरतोय, हे सर्वात भयानक आहे. ही घटना घडल्यानंतर या राज्याचे तत्कालिन ‘कोट्यधीश’ गृहमंत्री अनिल देशमुख अगदी लगेच म्हणजे २१दिवसानंतर (!) ७ मे २०२० ला घटनास्थळी दाखल झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे हत्या झाली, त्यादिवशी घटनास्थळी उपस्थित असलेला अनिल देशमुखांचा हा लाडका ‘दादा’ गृहमंत्र्यांसोबतच जातीने उपस्थित होता. या घटनेची सीबीआय वा अन्य कुठल्या केंद्रीय एजन्सी मार्फत चौकशी करून या घटनेमागचा खरा सूत्रधार असलेल्या ‘दादा’ला अटक करण्याची मागणी अनेक संघटना व राजकीय पक्षांनी केली होती. खरेतर गृहमंत्र्यांनी या दादाला आपल्यासोबत घेऊन त्याच दिवशी त्याला एका अर्थाने क्लिनचिट दिली होती असे म्हणता येईल. मात्र आपल्या राजकीय वजनाचा फायदा घेऊन घटनेपासून स्वत:ला नामनिराळे ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या या ‘दादा’ मुळे गडचिंचले गावातील १५०पेक्षा अधिक वनवासी कुटुंबांची मात्र अक्षरश: वाताहात झाली आहे.

पोलिसांना पाहताच जंगलात पसार होणाऱ्या वनवासी बांधवांनी ‘दादा’च्या जीवावर हे भयानक कृत्य केले खरे, पण या घटनेची जेव्हा जगभर चर्चा झाली, पोलिसांचा ससेमिरा मागे लागला, तेंव्हा या कृत्याचे गांभिर्य त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणात १५०पेक्षा अधिक व्यक्तिंना अटक करण्यात आली असून गेल्या वर्षभरापासून ५०पेक्षा अधिक आरोपी अजुनही कारागृहात आहेत. आज बहुतेक जण आपल्या कृत्याबाबत पश्चात्ताप करत असले तरी त्यांच्या कुटुंबांची परवड कल्पनेपेक्षाही कठीण आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांची अटक टाळण्यासाठी कित्येक जण किमान ३-४महिने तरी आपल्या कुटुंबासह जंगलात वणवण भटकत होती. या काळात त्यांच्या लहान लहान मुलांची काय अवस्था झाली असेल, याची आपण कल्पनाच करू शकतो. आसपासच्या गावांमध्ये रहात असलेल्या आरोपींच्या कित्येक नातेवाईकांनादेखील नाहक चौकशीला सामोरे जावे लागले. त्यातून आपल्या नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये या व्यक्तींची झालेली बदनामी कशी मोजणार ? अनेक कुटुंबांनी आपले मानसिक स्वास्थ्य व स्थैर्य गमावलेच, पण कित्येक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या पुरती उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनेमुळे गडचिंचले गावाचे नाव साऱ्या जगात ‘कुख्यात’ झाल्याने या गावाची बदनामी झाली ती वेगळीच.

अनुयायांच्या भल्याबुऱ्याचा विचार न करता त्यांच्या निष्ठेचा, विश्वासाचा आपल्या स्वार्थासाठी फायदा घेणारे अविचारी राजकीय नेतृत्त्व असेल तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला कसे भोगावे लागतात हे ही घटना सिद्ध करते.

त्यादिवशी गडचिंचले गावात आणखी एक हत्या झाली. ती हत्या सर्वात गंभीर मानली पाहिजे अशी आहे. ती हत्या झाली #जनजाती_संस्कार, परंंपरा, #संस्कृती यांची! मुळात एखाद्याला आणि ते देखील साधू-संन्याशाला जीवे मारण्याची घटना वनवासी-आदिवासी समाजास मान्यच नाही. अशी घटना कुठे घडणे शक्य देखील नाही. भारतातील कुठल्याही वनवासी क्षेत्रात आपण गेलो, तरी घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला देव समजून त्याची सर्वार्थाने चिंता करणे हा वनवासी माणसाचा सहज स्वभाव आहे. इथे तर दोन साधू आपल्या गावात आले होते आणि ते देखील वाट चुकुन आले होते. त्यांना जीवे मारण्याचे काही एक कारण नव्हते. मात्र या असहाय, नि:शस्त्र साधूंची व त्यांच्या चालकाची हत्त्या करून जमावाने एका अर्थाने आपल्याच संस्कृती परंपरेला काळीमा फासला असे म्हणता येईल. या घटनेनंतर #डाव्या_संघटना, #मिशनरी यांचे पाठीराखे असलेले #अर्बन_नक्षलवादी सारवासारव करण्यासाठी पुढे आले. कांदिवलीपासून हे साधू लॉकडाऊन असतानाही इथपर्यंत आलेच कसे ? इथपासून ते त्या भागात साधूच्या रूपात चोर येणार असल्याची अफवा होती, यासारख्या अनेक कंड्या पिकवण्यास या ब्रिगेडने सुरूवात केली. मात्र या घटनेमुळे समाजमन प्रक्षुब्ध असल्याने या मंडळींच्या कंड्या फारशा प्रभावी ठरू शकल्या नाहीत. मुळात अशा काही संशयास्पद व्यक्ति आढळल्या, तर त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करणे हे प्रत्येकाचे काम असते. गडचिंचले गावातील लोकांनी हे काम केले देखील. मात्र ‘दादा’ आला आणि जमावाचा विचार बदलला (की बदलवला ?). त्यांनी पोलिसांच्या ताब्यातून सुटका करून त्यांच्यासमोरच या साधूंची हत्या केली.

मुळात शासननिर्मित एखाद्या व्यवस्थेला न जुमानणे किंवा अशा कुठल्याही व्यवस्थेच्या विरोधात लोकांना भडकावणे, हे नक्षलवाद्यांच्या कार्यपद्धतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या घटनेत देखील सरळ सरळ नक्षलवाद्यांची कार्यपद्धती डोकावत असण्याची शक्यता सुरुवातीपासून व्यक्त केली जात आहे. त्या दिशेने शोध घेण्याची आवश्यकता आहे. मात्र तो घेण्यासाठी खूप मोठ्या राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते. ती इच्छाशक्ती इथल्या राज्य सरकारमध्ये असल्याचे काही दिसत नाही. या घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच राज्य सरकार चालढकलच करत असल्याचे लक्षात आले आहे. मुळात गडचिंचले घटनेत ज्याच्याकडे संशयाची सुई जाते, अशा व्यक्तीला राज्याचा गृहमंत्री सोबत घेऊन फिरतो अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार ? त्यामुळे सीबीआय सारख्या संस्थेकडून या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यावेळी देखील करण्यात आली होती आणि आजही हीच मागणी पुन्हा नव्याने करण्याची आवश्यकता आहे. अर्थात या मागणीसाठी जनमताचा रेटा पुन्हा नव्याने उभा करावा लागणार आहे.

या देशातील खिश्चन मिशनरी, डाव्या विचारांच्या संघटना, #विद्रोही_संघटना, नक्षलवादी यांना हाताशी धरून इथल्या जनजाती समाजात असंतोष पसरविण्याचे खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत. वर्षानुवर्षांपासून ज्या हिंदू प्रथा, परंपरांचा इथला वनवासी समाज पालन करत आला आहे, त्यापासून त्यांना बाजूला करण्याचे काम काही संघटना करीत आहेत. ते षड्यंत्र सर्वांनीच समजावून घेण्याची आवश्यकता आहे.

गडचिंचलेची घटना घडून एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र या हत्याकांडातील १५०च्या वर आरोपींच्या होरपळलेल्या कुटुंबाची अवस्था मात्र खूपच वाईट आहे. या सर्वांच्या बाबतीत एक संवेदनशील नागरिक म्हणून सहानुभूती सर्वांनी बाळगलीच पाहिजे. घटनेतील प्रमुख आरोपी मोकाट फिरत आहेत आणि निष्पाप लोक कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत हे चित्र देखील अस्वस्थ करणारे आहे.

एक खरे आहे की गेल्या वर्षी दोन साधूंच्या हत्येच्या रूपाने हिंदू समाजावर झालेली जखम अद्यापही भळभळतेयं. मात्र आपल्या हिंदू समाजाची स्मरणशक्ती जरा कमकुवतच असल्याने धर्माबाबतच्या कर्तव्याबाबत त्याला सतत जागृत ठेवावे लागते. धर्मासाठी #साधूसंन्यासी जेंव्हा घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडतात, तेंव्हा आपला #धर्म, धर्माचे पालन करणारी मंडळी आपले रक्षण करतील हा विश्वास त्यामागे असतो. मात्र गडचिंचले सारख्या घटना घडतात, तेंव्हा हा विश्वास काहीसा डळमळीत होऊ लागतो.

आज #स्वामी_कल्पवृक्षगिरी_महाराज, स्वामी #सुशीलगिरी_महाराज व #नीलेश_तेलगडे या तिघांना श्रद्धांजली वाहताना देव-देश व धर्मासाठी कार्य करणाऱ्या इथल्या प्रत्येक व्यक्तीचे व #धर्मश्रद्धा बळकट करणार्‍या प्रत्येक श्रद्धास्थानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी हिंदू समाजाला यापुढे अधिक जबाबदारीने व गतीने पुढे न्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण देखील हिंदू समाजालाच निर्माण करावे लागेल.
‘यापुढे या देशात कुठल्याही साधुसंतांची स्वबांधवांकडून हत्या होणार नाही’ असा शब्द #धर्मकार्य करत असताना आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या दोन दिवंगत आत्म्यांना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एक ‘हिंदू’ या नात्याने आपल्याला द्यावाच लागणार आहे.
( वनवासी कल्याण आश्रम)

(सौजन्य : फेसबूक)

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात