नारायण राणे यांची जीभ घसरली असेल, तर शिवसैनिकांचेही हात उठले आहेत. हे विसरून चालणार नाही. या दोन्ही घटनांकडे डोळे उघडे ठेवून आणि डोके जाग्यावर ठेवून प्रामाणिकपणे बघायचे असेल तर शिवसेनेच्या संस्कारातून आणि ठाकरी भाषेच्या शैलीतूनच बघितले गेले पाहिजे…!! ते न्यायोचित ठरेल…!! अन्यथा नारायण राणे यांना त्यांच्या एका वाक्यावरून नुसते ठोकत राहणे अन्याय्य ठरेल…!! Narayan Rane’s controversial statement irked Shiv sainiks
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेत जनतेचे आशीर्वाद घेता घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे वादग्रस्त उद्गार काढलेत त्यातून ते आपल्यावरचे वर्षानुवर्ष झालेले राजकीय संस्कार विसरले नाहीत हेच स्पष्ट दिसून येत आहे.
बाकी नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलताना, “मी असतो तर कानाखालीच लावली असती”, हे उद्गार केंद्रीय मंत्र्याला अजिबात शोभणारे नाहीत. इतकेच नाही तर ते ज्या जन आशीर्वाद यात्रेवर निघाले आहेत, त्या यात्रेसाठी सुद्धा राजकीय दृष्ट्या अनुकूल ठरणारे नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना जन आशीर्वाद यात्रा ज्या सकारात्मक कारणांसाठी काढण्याचे आदेश दिले होते, त्या आदेशाचा विपरीत नारायण राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य आहे. कारण यातून वादाचा धुरळा उठेल. शिवसेना याचा भरपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल आणि भाजपसाठी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर पाणी फेरले जाईल. केंद्रीय मंत्र्याच्या जन आशीर्वाद यात्रेतून ही फळे मिळावीत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित आहे काय…?? शिवसेनेच्या हातात नारायण राणे यांनी हे आयते कोलीत दिले आहे, की ज्याची गरज नव्हती.
पण त्याच वेळी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे नारायण राणे असे कसे बोलले? आणि कशामुळे बोलले? आक्रमकता हा नारायण राणे यांचा स्वभाव आहे. त्यांच्यात हा स्वभाव शिवसेनेच्या संस्कारातून आला आहे. शिवसेनेच्या म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या. बाळासाहेब जोपर्यंत हयात होते तोपर्यंत प्रत्येक शिवसैनिकाची भाषा “अशीच” होती. “कानाखाली जाळ काढीन”, “हात पाय तोडीन”, “तोडफोड करीन” हीच भाषा होती.
किंबहुना अशी भाषा न वापरणारा किंवा तशी कृती न करणारा शिवसैनिकच नाही. कानाखाली आवाज काढल्याशिवाय न्याय मिळत नाही, अशी भाषा आणि असे अग्रलेख बाळासाहेबांच्या सामन्यातून अनेकदा महाराष्ट्राच्या जनतेला वाचायला मिळाले आहेत. माझा शिवसैनीक कडवटच पाहिजे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणत असत.
नारायण राणे हे बाळासाहेबांचे कडवटच शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर वर्षानुवर्ष तेच संस्कार झाले आहेत. ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर बारा वर्षांमध्ये बदलले नाहीत. ते भाजपमध्ये येऊन काहीच महिने झाले आहेत. अशा स्थितीत भाजपची राजकीय संस्कृती इतक्या थोडक्या महिन्यांमध्ये ते कशी काय आत्मसात करू शकतील??
शिवाय शिवसेनेच्या नेत्यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा कडक शब्दात निषेध करताना जी भाषा वापरली आहे ती राणे यांच्या सारखीच आहे ना…!! “हात तोडू”, ही खासदार विनायक राऊत यांनी वापरलेली भाषा नारायण राणे यांच्या कानाखाली वाजवण्याचा भाषेपेक्षा वेगळी आहे काय…?? जर अशी धमकीभरी भाषा शिवसैनिकांनी वापरली तर ती “ठाकरी भाषा” आणि इतरांनी वापरली तर मात्र “शिवराळ निषेधार्ह भाषा” असा दुटप्पी व्यवहार करून चालणार नाही.
नारायण राणे यांची जीभ घसरली असेल, तर शिवसैनिकांचेही हात उठले आहेत. हे विसरून चालणार नाही. या दोन्ही घटनांकडे डोळे उघडे ठेवून आणि डोके जाग्यावर ठेवून प्रामाणिकपणे बघायचे असेल तर शिवसेनेच्या संस्कारातून आणि ठाकरी भाषेच्या शैलीतूनच बघितले गेले पाहिजे…!! ते न्यायोचित ठरेल…!! अन्यथा नारायण राणे यांना त्यांच्या एका वाक्यावरून नुसते ठोकत राहणे अन्याय्य ठरेल…!!
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App