तालिबानी राजवटीबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचे आणि विविध राज्यातल्या नेत्यांचे धोरण वेगवेगळे आहे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीतही फरक आहे. काँग्रेस निष्ठ विचारवंत तालिबानवर तोलून-मापून सौम्य टीका करतात, तर संघ आणि भाजपला ठोकून काढताना दिसतात. जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शहा यांच्या वक्तव्यांमधून भारतातल्या तथाकथित लिबरल विचारवंतांचा वैचारिक दंभ प्रतिबिंबित होतोय…!! Congress leaders and liberals are selectively targeting RSS parivar over Taliban attitude; but soft on their stand on Taliban government
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर भारतातून ज्या विविध प्रतिक्रिया उमटल्या त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यातही काँग्रेस नेते आणि काँग्रेसनिष्ठ विचारवंत यांच्या प्रतिक्रिया अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात असलेले नेते मोदी सरकारच्या अफगाणिस्तान विषयक आणि तालिबान विषयक धोरणावर सवाल खडे करताहेत. किंबहुना मोदी सरकार तालिबान समोर कशी नांगी टाकतेय, मिळमिळीत भूमिका घेते आहे, अशीच टीका केंद्रातल्या काँग्रेस नेत्यांची आहे. एएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी तर पडद्यामागून काय तालिबानशी प्रेम करता!!, उघडपणे करा ना!!, असे मोदी सरकारला डिवचत आहेत.
अशा स्थितीत तालिबानी राजवटीवर संघ किंवा भाजप यांच्या प्रतिक्रियांपेक्षा काँग्रेसच्या केंद्रातल्या प्रतिक्रिया आणि काँग्रेसच्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या प्रतिक्रिया यामध्ये भेद दिसून येतोय./काँग्रेसचे झारखंड मधील आमदार इरफान अन्सारी हे तर उघडपणे तालिबानचे समर्थन करताना दिसत आहेत. तालिबानी राजवटीत अफगाणी जनता खूष असल्याचा त्यांचा दावा आहे. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने जो निर्णय घेतला आहे तो अधिक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा आहे. हेमंत सोरेन यांच्या सरकारने विधानभवनात नमाज पठणासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून दिले आहे. काँग्रेस बोलण्यात आणि वागण्यात दुटप्पी भूमिका घेते ती इथेच…!!
झारखंड विधान भवन परिसरात अन्य कोणत्याही धर्मीयांचे प्रार्थनास्थळ आज अस्तित्वात नाही. किंबहुना कोणत्याही कायदे मंडळ परिसरात अशा स्वरूपाचे प्रार्थनास्थळ निर्माण करण्याचे कोणतेही प्रयोजनच नाही. तरीदेखील झारखंडमध्ये नमाज पठणासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा काँग्रेस नेत्यांनी आणि काँग्रेस निष्ठ विचारवंतांनी निषेध केलेला नाही.
बॉलीवूडचे गीतकार आणि संवाद लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानवर टीका करून घेतली आहे. तालिबानची मानसिकता कशी मध्ययुगातली आहे, महिलांची ते कसा भेदभाव करतात वगैरे वर्णन त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. यातून ते खरोखरच लिबरल आहेत की काय असा समज पसरतो. परंतु तेवढ्यात त्यांनी वेगळी वैचारिक कोलांटउडी मारून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यावरही दुगाण्या झोडून घेतल्या आहेत.
वास्तविक पाहता तालिबानशी वर उल्लेख केलेल्या संघटनांचा काहीही संबंध नाही. तालिबान सारखी हिंसक वर्तणूक या संघटनांची नाही. या संघटना फार तर प्रतिकारवादी किंवा प्रतिक्रियावादी असे म्हणता येईल. परंतु, तालिबान सारखी धार्मिक कट्टर राजवट लादण्याचा या संघटनांचा कोणताही इतिहास अथवा वर्तमान नाही. तरी देखील आपल्या विशिष्ट किंबहुना तथाकथित लिबरल विचारसरणीतून जावेद अख्तर यांनी ओढून ताणून संघ परिवाराची तुलना तालिबानशी करून घेतली आहे. ते करताना त्यांनी अतिशय चातुर्याने तालिबानला एक “छोटा गट” म्हणून घेतले आहे. बाकीच्या मुसलमानांची तालिबानचा संबंध नाही. आजचा मुसलमान तरुण रोजगार शिक्षण चांगले जीवन यासाठी धडपडतो आहे. तो तालिबानला पाठिंबा देत नाही, अशी वैचारिक भूमिका घेत त्यांनी मुस्लीम समाजाला तालिबान पासून चातुर्याने अलग असल्याचा दावा करून घेतला आहे. एक प्रकारे मुस्लिम समाजाला त्यांनी वैचारिक shielding दिले आहे किंवा त्यांनी आपल्या “वैचारिक पदराखालीच” घेतले आहे.
नेमकी हीच भारतातल्या तथाकथित लिबरल विचारवंतांची जुनी खोड आहे. वैचारिक दांभिकता आहे. ते संघ आणि भाजपला झोडण्यासाठी तालिबानचा विरोध असल्याचे दाखवतात. मूलतः तालिबानी विचारसरणीला स्वतंत्रपणे विरोध करण्याची त्यांची क्षमता आणि इच्छाही नसते. परंतु आपण तटस्थ आहोत हे दाखवण्यासाठी ते तालिबानी विचारसरणीचा वरवर विरोध करतात आणि पुन्हा आपल्या मूळ अजेंड्याकडे वळून संघ – भाजपला झोडायला सुरूवात करतात.
हेच परवाच्या नसरुद्दीन शहा यांच्या विधाननातूनही स्पष्ट होताना दिसते. तालिबानवर तोलून – मापून सौम्य टीका करायची. मुसलमान समाजाला selectively टीकेतून वगळायचे आणि हिंदू संघटना – हिंदू समाजावर कठोर टीका करायची, असे काँग्रेस निष्ठ लिबरल विचारवंतांचे वर्षानुवर्षांचे धोरण राहिले आहे. ते जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शहा तंतोतंत पाळताना दिसत आहेत.
यातूनच ते अप्रत्यक्षपणे स्वतःला आणि मुसलमान समाजाला तालिबानच्या दिशेने ढकलताना दिसत आहेत. अन्यथा ते जर खरे तटस्थ असते तर त्यांनी संघ परिवारावर selective टीका करून घेतली नसती आणि झारखंड सारख्या राज्यात विधान भवनात नमाज पठणासाठी स्वतंत्र दालन देण्याच्या निर्णयावर खऱ्या अर्थाने टीका केली असती. परंतु अद्याप त्यांनी ते केलेले नाही याचा अर्थच त्यांच्या मनात “वैचारिक खोट” आहे, हे स्पष्ट होते…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App