Dilip Kumar Death : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. दिलीपकुमार यांनी बुधवारी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार अनेक दिवसांपासून आजारी होते, त्यांना बर्याच वेळा रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या ट्रॅजेडी किंगचा जीवनप्रवासही तेवढाच रंजक होता. जाणून घ्या त्याविषयी… Veteran Actor Dilip Kumar Death, Know Life Journey Of Dilip Kumar and Unknown Facts
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. दिलीपकुमार यांनी बुधवारी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार अनेक दिवसांपासून आजारी होते, त्यांना बर्याच वेळा रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या ट्रॅजेडी किंगचा जीवनप्रवासही तेवढाच रंजक होता. जाणून घ्या त्याविषयी…
शतकानुशतके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याची संधी मिळालेले चित्रपटसृष्टीत फारच कमी कलाकार आहेत. दिलीप कुमार अशा सेलिब्रेटींपैकी एक होते, ते केवळ चित्रपटाच्या पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही लोकांचे नायक बनले आणि त्यांच्या हृदयात कायमचे स्थायिक झाले. दिलीप यांचे नाव आणि काम याबद्दल चाहत्यांमध्ये अशी क्रेझ होती की, लोक त्यांचा कोणताही चित्रपट पाहण्यास चुकवत नव्हते. तरुणी तर त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायच्या. दिलीप कुमार बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींच्या मनात होते. त्यापैकी एक त्यांची पत्नी सायरा बानो होती.
दिलीपकुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी ब्रिटिश अंमलाखालील भारतात पेशावरमध्ये किस्सा खवानी बाजार परिसरातील हवेलीमध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांची आई आयशा बेगम आणि वडील लाला गुलाम सर्वर खान होते. दिलीप यांना 12 भावंडे होती. दिलीप कुमार यांनी आपले शालेय शिक्षण नाशिकच्या देवळी येथील बार्नेस स्कूलमधून केले. सुपरस्टार राज कपूर त्यांचे बालपणीचे मित्र होते. दोघांचं बालपण एकाच परिसरात गेलं. नंतर दोघेही फिल्मी स्टार आणि मित्र झाले.
1940 मध्ये दिलीपकुमार यांचा वडिलांशी वाद झाला, त्यानंतर ते घर सोडून पुण्याला आले. येथे त्यांनी पारशी कॅफे मालक आणि वयोवृद्ध एंग्लो-इंडियन दांपत्याच्या मदतीने आपला सँडविच स्टॉल लावला. हा कॉन्ट्रॅक्ट त्यांचे ज्ञान व उत्तम इंग्रजी बोलण्यामुळे मिळाला. कराराच्या शेवटी दिलीप कुमार यांनी 5000 रुपयांची बचत केली होती. यानंतर ते मुंबईत परतले होते.
1943 मध्ये घरात वडिलांच्या मदतीसाठी दिलीपकुमार नोकरी शोधत शोधत बॉम्बे टॉकीजमध्ये पोहोचले. सुरुवातीला दिलीप कुमार उर्दू भाषेवरील प्रभुत्वामुळे कथालेखन आणि पटकथालेखन करत असत. त्यावेळी बॉम्बे टॉकीजच्या मालकीण असलेल्या अभिनेत्री देविका राणी यांनी त्यांना आपले मोहम्मद यूसुफ खान नाव सोडून दिलीप कुमार घेण्यास सांगितले. यानंतर देविका यांनी त्यांना 1944 मध्ये रिलीज झालेल्या ज्वार भाटा या चित्रपटात कास्ट केले. या चित्रपटाची तेवढी चर्चा झाली नाही.
काही फ्लॉप दिल्यानंतर दिलीप कुमारने अभिनेत्री नूरजहांसोबत ‘जुगनू’ चित्रपटात काम केले. हा त्यांचा पहिला हिट चित्रपट होता. यानंतर त्यांनी शहीद आणि मेल यासारखे हिट चित्रपट दिले. त्यानंतर त्यांनी नर्गिस आणि मित्र राज कपूर यांच्याबरोबर शबनम चित्रपटात काम केले. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट हिट ठरला होता. 1950 हा दिलीप कुमारांचा काळ होता. याच वेळी त्यांनी एकामागून एक हिट चित्रपट दिले.
हाच काळ होता जेव्हा दिलीप कुमार यांनी अनेक गंभीर भूमिका केल्या, ज्यामुळे त्यांना बॉलीवूडच्या ट्रॅजेडी किंगचे नाव मिळाले. आपले दुःखद पात्र साकारताना त्यांना काही काळ नैराश्याच्या समस्येनेही ग्रासले. यानंतर त्यांच्या मनोचिकित्सकाच्या सल्ल्यानुसार, ते आनंदी भूमिका वठवू लागले. त्यांनी मेहबूब खान या चित्रपटात पहिली लाइट भूमिका केली होती. दु:खद भूमिकांबरोबरच प्रेक्षकांना दिलीपकुमारची हलकी, हसणारी शैलीदेखील आवडली आणि ते हिट ऑन हिट देत राहिले.
1960 मध्ये दिलीप कुमार यांनी मुघल-ए-आझम चित्रपटात शहजादा सलीमची भूमिका केली होती. हा बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि 11 वर्षे तो अव्वल राहिला. 161 मध्ये त्यांनी गंगा जमुना हा पहिला चित्रपट तयार केला आणि निर्माता म्हणून हा त्यांचा एकमेव चित्रपट होता. 1970 चा तो काळ होता जेव्हा दिलीपकुमार यांना आपल्या कारकीर्दीत अपयशाला सामोरे जावे लागले. त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आणि राजेश खन्ना आणि संजीव कुमार यांना त्यांच्याऐवजी अनेक चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. अशा परिस्थितीत त्यांनी 5 वर्षांचा ब्रेक घेतला.
1981 मध्ये दिलीप कुमार यांनी क्रांती या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले होते. हा चित्रपट त्या वर्षाचा सर्वात मोठा हिट चित्रपट होता. 1991 मध्ये सौदागर हा बॉक्स ऑफिसवरचा शेवटचा यशस्वी चित्रपट होता. 1998 मध्ये ‘किला’ हा त्यांचा अखरेचा चित्रपट फ्लॉप झाला होता. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सोबत सुभाष घईच्या ‘मदर लँड’ या चित्रपटात ते दिसणार होते, पण हा चित्रपट कधी बनलाच नाही.
दिलीप कुमार हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेते मानले जात होते. भारतीय अभिनेता म्हणून सर्वाधिक पुरस्कार जिंकल्याबद्दल त्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. पाच दशकांच्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी बरेच पुरस्कार जिंकले होते. यात 8 फिल्मफेअर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अभिनेता), फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पाकिस्तान सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान-ए-पाकिस्तान यांचा समावेश आहे. यामुळेच दिलीप कुमारसारखा कलाकार कोणत्याही चित्रपटसृष्टीत कधी नव्हता आणि कधी होणारही नाही.
Veteran Actor Dilip Kumar Death, Know Life Journey Of Dilip Kumar and Unknown Facts
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App