विशेष प्रतिनिधी
मुंबई : Suneetra Pawar दिवंगत नेते अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला पक्षातूनच मोठा सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान दिले आहे. या अत्यंत अनपेक्षित कायदेशीर पवित्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.Suneetra Pawar
सच्चिदानंद सिंह यांनी ९ जुलै रोजी ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. यामध्ये त्यांनी पक्षांतर्गत लोकशाहीचा दाखला देत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. ही नोटीस सुनेत्रा पवार (पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून), प्रफुल्ल पटेल (कार्यकारी अध्यक्ष म्हणून), ब्रिजमोहन श्रीवास्तव (पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून) यांना पाठवण्यात आली आहे.Suneetra Pawar
सुनेत्रा पवारांच्या निवडीबाबत आक्षेप काय?
नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही निवड तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच, एका स्वतंत्र आणि निष्पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करून नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जावी. तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित ऑफिस बेअररची (पदाधिकाऱ्यांची) यादी अवैध समजण्यात यावी, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे आली होती सूत्रे
गत जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका विमान अपघातात अकाली निधन झाले होते. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची विखुरलेली घडी बसवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही स्वीकारली. त्यानंतर पक्षाच्या एका रितसर बैठकीत सर्वानुमते त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या पक्षात अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार आणि धाकटे पुत्र जय पवार हे देखील सक्रिय भूमिका बजावत असून, पवार कुटुंबाचे पक्षात महत्त्वाचे स्थान आहे. असे असताना थेट अध्यक्षपदालाच आव्हान मिळाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पक्षात सारं काही आलबेल नाही? पडद्यामागच्या घडामोडी
या कायदेशीर वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. पक्षात प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध इतर गट असा छुपा संघर्ष सुरू असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यावर खासदार सुनील तटकरे यांनी बैठकीत जाहीर खंतही व्यक्त केली होती, ज्यानंतर सुनेत्रा पवारांनी स्वतः बैठक घेऊन सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा वाद शमला नसून तो आता थेट कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.
आता उभे राहिलेले मोठे प्रश्न
सच्चिदानंद सिंह यांनी नेमक्या कोणत्या तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटींच्या आधारे हा दावा केला आहे, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, सुनेत्रा पवार जेव्हा पूर्ण ताकदीने पक्ष वाढीसाठी सक्रिय झाल्या आहेत, अशा वेळी अचानक आलेल्या या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जसे की…
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या वेळी पक्षात काही कायदेशीर पळवाटा राहिल्या होत्या का? या संपूर्ण कायदेशीर लढाईच्या मागे पक्षातीलच काही बड्या नेत्यांचा सुप्त पाठिंबा आहे का? आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची नवी लढाई सुरू होणार का?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App