विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dhananjay Munde सोशल मीडियावर मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील सायबर छळछावण्यांमध्ये अडकवून त्यांच्याकडून जबरदस्तीने ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हे करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.Dhananjay Munde
दरमहा ७० हजारांचे आमिष आणि १६-१८ तासांचा छळ!
३० जून २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट येथील स्वप्नील काळुंके याच्यासह नाशिक, धाराशिव, चाळीसगाव आणि ठाणे येथील अनेक तरुण सोशल मीडियावरील नोकरीच्या जाहिरातींना भुलून म्यानमार-थायलंड सीमेवर पोहोचल्याचे नमूद केले आहे. तेथे त्यांना कथित सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात ठेवून दररोज १६ ते १८ तास ऑनलाइन फसवणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असून, विरोध केल्यास अमानुष मारहाण आणि इलेक्ट्रिक शॉक दिले जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.Dhananjay Munde
७०० ते ८०० भारतीय मृत्यूच्या दाढेत; महाराष्ट्रातील २०-२५ तरुण
मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, या छावण्यांमध्ये सुमारे ७०० ते ८०० भारतीय तरुण अडकले असल्याची माहिती असून, त्यापैकी २० ते २५ जण महाराष्ट्रातील आहेत. या प्रकरणी बीड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, राज्य पोलिसांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र हा आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा विषय असल्याने राज्य सरकारने केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधून अडकलेल्या तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी उच्चस्तरीय प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, महाराष्ट्रातून तरुणांना परदेशात पाठवणाऱ्या एजंटांच्या संपूर्ण जाळ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App