नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस आता जास्तच घराणेशाहीच्या कोंडीत; सुनेत्रा पवारांनी वाढ केली दोन्ही मुलांच्याच जबाबदारीत!!, ही राजकीय घडामोड घडल्याचे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान झाल्यानंतर समोर आली. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातल्या घराणेशाहीतल्या अविश्वासाच्या बऱ्याच भेगा रुंदावल्या. त्याचाच परिणाम सुनेत्रा पवारांनी स्वतःची घराणेशाही घट्ट करण्यात झाला. Sunetra Pawar
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर ज्या काही वेगवान हालचाली झाल्या, त्यातून सुरुवातीला शरद पवारांनी अजित पवारांचा पक्ष ताब्यात घेऊन त्यावर स्वतःचे आणि सुप्रिया सुळे यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा “डाव” खेळला. या डावातून सुटका करून घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांना भाजपने आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी मदत केली. त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारायला लावले. त्यामुळे शरद पवारांचा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसवर कब्जा करायचा डाव उधळला गेला. पवारांच्या पक्षातले नेते सत्तेपासून वंचित ठेवले गेले. यात सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे यांचा समावेश राहिला. सुनेत्रा पवारांनी या चौघांना सत्तेच्या वळचणीला फिरकू दिले नाही.
रोहित पवारांची आदळआपट
त्यामुळे रोहित पवारांनी चिडून अजित पवारांच्या अपघाताला घातपात ठरविण्यासाठी जंग जंग पछाडले. त्यांनीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात राजकीय रान उठविले. पण त्यांना दोन्ही बाबतीत फारसे यश आले नाही. त्याचवेळी सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस वर पकड घट्ट करायची संधी मिळाली. त्यांनी ती संधी घेऊन पार्थला राज्यसभेवर पाठविले. जय पवार कडे बारामतीची सूत्रे दिली.
याच दरम्यान बारामतीची पोटनिवडणूक झाली. त्यातही बरेच राजकारण रंगले. पवारांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये उमेदवारीची हवा भरली. पण नंतर राजकीय वातावरण फिरल्याचे पाहून काँग्रेसमध्ये स्वतःच भरलेली उमेदवारीची हवा काढून घेतली. अजित पवारांच्या शेवटच्या दिवशी पुढे पुढे करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला नाही. त्या फक्त प्रचाराच्या सांगता सभेसाठी आल्या. त्यांनी भाषण केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थानी येण्यापूर्वीच त्या तिथून निघून गेल्या.
रोहित पवारांची ठिणगी
बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच म्हणजे काल रोहित पवार विरुद्ध इतर पवार असा राजकीय कलगीतुरा रंगला. बारामतीत २०२९ ची निवडणूक पवार विरुद्ध पवार होईल, अशी राजकीय पेरणी रोहित पवारांनी करून पवार कुटुंबीयांमध्ये ठिणगी टाकली. त्याचेच रूपांतर आज वेगळ्या प्रकारे “राजकीय वणव्यात” झाले.
पार्थ आणि जय वर नव्या जबाबदाऱ्या
सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या घराणेशाहीच्या घोंगडीत घट्ट गुंडाळून घेतले. त्यांनी आपली दोन्ही मुले सोडून इतर कुठल्याही नेत्यांवर विश्वास न ठेवता फक्त आपल्या दोन मुलांना जबाबदारी वाढवून दिली. मराठी माध्यमांनी त्यांचे वर्णन थ्री लेअर सूत्राची अंमलबजावणी असे केले. यामध्ये त्या स्वतः महाराष्ट्रात फिरून पक्ष वाढवतील, तर पार्थ कडे मुंबई आणि दिल्लीतल्या राजकीय समन्वयाची जबाबदारी असेल. जय कडे बारामती आणि पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची जबाबदारी असेल. याचा अर्थ सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर स्वतःच्या घराणेशाहीची पकड जास्त घट्ट केली. पण या खेळीतून त्यांनी राष्ट्रवादीच्या इतर महत्त्वाच्या घटकांना दुखवून ठेवून पक्षाच्या वाढीत आणि दीर्घकालीन वाटचालीत अडथळे पेरून ठेवले, एवढे मात्र नक्की.
सुनेत्रा पवारांकडे नसेल पर्याय
कारण आगामी काळात राजकारणाचा पूर्ण पोतच बदलून जाईल. राजकारण जास्तीत जास्त महिला केंद्रित होईल, त्यावेळी घराणेशाहीच्या राजकारणाला घरघर लागलेली असेल, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी सुनेत्रा पवारांकडे फारसे पर्याय उरलेले नसतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App