विशेष प्रतिनिधी
पुणे: अशोक खरातच्या संबंधित वादाने आता राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चाकणकर यांच्या राजकीय कारकिर्दीला तूर्तास ‘ब्रेक’ लागल्याची चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. खरात यांच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे आणि समोर आलेल्या काही पुराव्यांमुळे पक्षाची मोठी बदनामी होत असल्याचा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अखेर कठोर पाऊल उचलल्याचे समजते.
पक्षांतर्गत नाराजी आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय:
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि या वादग्रस्त प्रकरणामुळे निर्माण झालेल्या प्रतिमेवर पक्षातील अनेक वरिष्ठ नेते कमालीचे नाराज होते.
महिलांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या नेत्याच अशा वादात अडकल्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले होते.
पक्षाच्या शिस्तीला तडा जाऊ नये आणि आगामी निवडणुकांमध्ये फटका बसू नये, यासाठी हायकमांडने त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
चाकणकर यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह?
महिला आयोगाच्या माध्यमातून ओळखल्या जाणाऱ्या रूपाली चाकणकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकाच वेळी दोन्ही महत्त्वाची पदे गमवावी लागल्याने त्यांच्या राजकीय भविष्याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
“पक्षाची प्रतिमा कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी असते. झालेल्या बदनामीमुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून हा कठोर निर्णय घेण्यात आला असावा,” अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
या राजीनाम्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आता कोणाकडे सोपवली जाते आणि चाकणकर यावर काय अधिकृत स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App