विशेष प्रतिनिधी
मुंबई : Farmers राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मका खरेदीसाठी राज्य सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने मका खरेदीची मुदत आता ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवून दिली आहे. तसेच मूळ मंजूर उद्दिष्टाव्यतिरिक्त अतिरिक्त ५ लाख क्विंटल मका खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने मका विकावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.Farmers
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यात इथेनॉल निर्मिती आणि हमीभाव खरेदी केंद्रांच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, पणन हंगाम २०२५-२६ मध्ये ५ मार्चपर्यंत राज्यातील १४ जिल्ह्यांतील सुमारे ६०,०३५ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत १३,६६० शेतकऱ्यांकडून ५,६८,३३१.८ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २,४०० रुपये या आधारभूत किमतीने मोबदला दिला जात आहे. केंद्र शासनाकडून मूळ मंजूर ६.६० लाख क्विंटल मका खरेदी उद्दिष्टाव्यतिरिक्त अतिरिक्त पाच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.Farmers
वैजापूर तालुक्यात जोमाने खरेदी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मका खरेदी प्रक्रियेने वेग घेतला आहे. जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात ४०० क्विंटल, तर ४ मार्च २०२६ पर्यंत तालुक्यातील ३ केंद्रांवर २,३८६ शेतकऱ्यांकडून ४६,५४२.५० क्विंटल मका खरेदी पूर्ण झाली आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मका वापरला जात नसल्याच्या तक्रारींवर शासनाने स्पष्टीकरण दिले आहे. केंद्राच्या धोरणानुसार, हमीभावाने खरेदी केलेला मका हा सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी (रेशनसाठी) वापरला जातो, इथेनॉलसाठी नाही. तथापि, इथेनॉल निर्मितीसाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडील अतिरिक्त तांदूळ (५२ लाख मे टन) डिस्टिलरीजना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही हंगामांत लक्षणीय वाढ
सन २०२५-२६ च्या खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत मका पिकाने उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक कामगिरी नोंदवली आहे. मागील वर्षाच्या (२०२४-२५) तुलनेत मक्याच्या क्षेत्रात आणि उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. खरीप हंगाम उत्पादनात ३९.६ % वाढ तर रब्बी हंगाम उत्पादनात ५८.७% वाढ झाली आहे. आतापर्यंत ६०,०३५ नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ २२% (१३,६६०) शेतकऱ्यांचा मका खरेदी झाला आहे. ३१ मार्चची मुदत जवळ असल्याने उर्वरित ७८% शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण करणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App