नाशिक : भाजपाकडून राजकीय प्रयोग जोरात पण पवारांचा पक्ष जुन्याच प्रयोगाच्या कर्दमात म्हणजे चिखलात!!, असे राजकीय चित्र आज राज्यसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने समोर आले. Sharad Pawar
सुनेत्रा पवारांना बळ द्यायचा प्रयोग
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये जोरदार राजकीय प्रयोग केले. त्याआधी अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर भाजपनेच महाराष्ट्रात सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला बळ देणारा राजकीय प्रयोग केला. त्यांना उपमुख्यमंत्री केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पर्वानंतर सुनेत्रा पर्व सुरू केले. महाराष्ट्राचा राष्ट्रवादीत अजित पर्व सुरू झाल्याची घोषणा सुनील तटकरे यांनी आधीच केली होती पण त्यांनीच नंतर आता सुनेत्रा पर्व सुरू झाल्याची घोषणा केली. पण या सगळ्याच्या मागे भाजपच्या राजकीय बळाची प्रेरणा होती. भाजपच्या राजकीय प्रेरणेच्या बळातूनच सुनेत्रा पर्व महाराष्ट्रात सुरू होऊ शकले अन्यथा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गिळंकृत केले असते. पण भाजपने शरद पवारांचा तो विलीनीकरणाचा प्रयोग रोखला आणि महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू करायला परवानगी दिली.
नितीश कुमार यांची बिहार मधून सन्मानपूर्वक एक्झिट
त्यापाठोपाठ राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने बिहार मधले नितीश पर्व संपविले. ते नितीश पर्व सन्मानपूर्वक राज्यसभेत आणले. म्हणून तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नितीश कुमार यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः बिहार विधानसभेत पोहोचले. अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत नितीश कुमार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यांच्या बिहार मधल्या राजकारणातल्या सन्मानपूर्वक एक्झिट मुळे तिथे भाजपचे राजकारण सुरू झाले. भाजपला तिथे मुख्यमंत्री पदाची संधी उपलब्ध झाली किंबहुना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ती करवून घेतली. नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यांची व्यवस्थित राजकीय सोय लावायचा शब्द भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नितीश कुमार यांना दिला म्हणून तर त्यांनी स्वतःहून बिहारच्या राजकारणातून सन्मानपूर्वक एक्झिट घेत राज्यसभेत पोहोचायचा “डाव” खेळला, पण या डावा मागे भाजपने आपली शक्ती उभी केली म्हणूनच नितीश कुमार तो प्रयोग यशस्वी करू शकले.
त्याआधी भाजपने नितीन नवीन यांच्यासारख्या बिहारी नेत्यालाच राष्ट्रीय अध्यक्षपदी आणून पक्षांतर्गत पुढच्या पिढीचा प्रयोग सुरू केला.
विलीनीकरणाचा साप सोडला, पण सुनेत्रा गटाने तो ठेचला
पण या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून मात्र कुठलाही राजकीय प्रयोग न होता शरद पवारांची राज्यसभेची उमेदवारी पुढे रेटण्यात आली. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी अजितदादांचा पक्ष बळकवायचा “डाव” टाकला होता. त्यासाठी अगदी विलीनीकरणाचा साप देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पायात सोडला होता. पण सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ धनंजय मुंडे यांनी तो साप वेळीच ठेचून काढला. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी वर कब्जा करायचा डाव फोल ठरला. त्यामुळे स्वतः शरद पवारांचे आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व प्रस्थापित अखंड राष्ट्रवादीवर होऊ शकले नाही. त्याऐवजी त्यांना सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची स्पर्धा सुरू झाली.
तरुण नेत्याऐवजी पवारांनी स्वतःचीच उमेदवारी रेटली
या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना कुठलाही नवा प्रयोग करता आला नाही. कुठल्याही नव्या दमाच्या तरुण नेत्याला राज्यसभेची संधी देता आली नाही. त्याउलट त्यांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या नावाच्या जुन्या प्रयोगाच्या कर्दमात म्हणजे चिखलात अडकली. शरद पवारांना सुद्धा संजय राऊत यांच्या तोंडून स्वतःची उमेदवारी पुढे रेटावी लागली. त्यासाठी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांना कामाला लावून त्यांना काँग्रेसच्या नेत्यांच्या दारात आणि उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीच्या दारात पाठवावे लागले. तेव्हा कुठे अखेरच्या दिवशी शरद पवारांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर होऊ शकली. सुनेत्रा पवारांनी आपला मुलगा पार्थ पवारचे राज्यसभेचा उमेदवार करून व्यवस्थित राजकीय बस्तान बसविले, पण शरद पवारांना सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व त्यांच्याच राष्ट्रवादीत अजूनही प्रस्थापित करता आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App