नाशिक : गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले; पुतण्याच्या आवाजामुळे काकांचा आवाज दबला; घड्याळाच्या टिकटिकीपुढे तुतारीचा आवाज पिचकला!!, हेच काल रात्री पुण्यात घडले. अजित पवारांच्या दादागिरी पुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे काही चालले नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली. अजितदादांनी तुतारीवर केलेला आघात पवारांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी अजितदादांपुढे माघार घेतली. शरद पवारांच्या नेत्यांनी अजितदादांचा नाद सोडून देत महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांशी चर्चा सुरू केली.
– अजितदादांची ताठर भूमिका
पवार काका आणि पुतणे एक होणार. पुण्यात बळकट भाजपला टक्कर देणार, असा आव शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणला होता. पण तो एकाच झटक्यात खाली उतरला. अजितदादांची ठाम भूमिका त्यासाठी कारणीभूत ठरली. पुणे शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची फारशी ताकदच उरलेली नाही. त्यामुळे तुमच्या उमेदवारांना घड्याळ चिन्हावरच लढवा, अशी भूमिका अजित पवारांनी शरद पवारांच्या नेत्यांपुढे मांडली, पण शरद पवारांच्या नेत्यांना ही भूमिका मान्य झाली नाही. कारण अजितदादांनी तुतारीवर आघात केला म्हणजे आपला पक्षच गिळंकृत केला, असे शरद पवारांच्या नेत्यांच्या लक्षात आले. अजितदादांचा डाव त्यांनी ओळखला. त्यामुळे त्यांनी तिथेच चर्चा अर्धवट सोडली आणि ते निघून गेले.
यानंतर शरद पवारांच्या नेत्यांनी हॉटेल शांताई मध्ये जाऊन महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली. त्यामुळे पुण्यात वेगळ्याच समीकरणाला सुरुवात झाली.
– गाढव गेले आणि ब्रह्मचर्य सुद्धा गेले
पण या सगळ्यात शरद पवारांच्या पक्षाबाबत मात्र गाढव गेले आणि ब्रह्मचर्य सुद्धा गेले, अशी अवस्था निर्माण झाली. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी पुढे त्यांची डाळ शिजली नाहीच, पण भाजपच्या सत्तेशी जुळवून घेण्याची वेळ पवारांवर आली म्हणून पवार समर्थक पत्रकारांनी सुद्धा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना ठोकून काढले. याच दरम्यान प्रशांत जगताप यांनी ठाम तात्त्विक भूमिका घेऊन शरद पवारांच्या पोकळ धर्मनिरपेक्ष तात्त्विक भूमिकेच्या मुळाशी मोरचूद घातला. शरद पवारांसारख्या फार मोठ्या मुत्सद्दी नेत्याला प्रशांत जगताप यांच्यासारख्या स्थानिक पातळीवरच्या नेत्याने वैचारिक धडा शिकविला.
– भाजपच्या पथ्यावर
पण या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचा भाजप खऱ्या अर्थाने “चाणक्य” ठरला. कारण फडणवीसांनी फार मोठी गेम करत अजितदादांना महायुतीतून एकटे पाडले. त्यांची शक्ती कमी असल्यामुळे त्यांना काकांबरोबर जाणे भाग पाडले, पण हे सगळे करताना भाजपने दोघांमध्ये ज्या पद्धतीने राजकीय पाचर मारली, त्यामुळे त्यांना दोन वेगवेगळे पक्ष म्हणून वाटाघाटी करायची वेळ आली. अजितदादांनी थोडी ताठर भूमिका घेताच दोन्ही पक्षांची चर्चा फिस्कटली. या सगळ्या घडामोडी भाजपच्या पथ्यावर पडल्या. भाजपने पवार काका – पुतण्यांची पुण्यासारख्या बालेकिल्ल्यात राजकीय फरफट केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App