विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीचे संकेत मिळत असून, उद्याच त्यांचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही नवी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.Sanjay Raut
दुसरीकडे, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचालींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. अजित पवार यांचे नेते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, त्यामुळे जर पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत ते हातमिळवणी करणार असतील, तर त्यांना महायुतीत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. तसेच, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास शिवसेना ठाकरे शरद पवारांच्या गटासोबत न जाता मनसे आणि काँग्रेसला सोबत घेऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.Sanjay Raut
मुंबईतील महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी माहिती दिली की, मुंबईत काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, ती यशस्वी झाल्यास उद्याच्या पत्रकार परिषदेला शरद पवार स्वतः उपस्थित राहू शकतात. काँग्रेस मुंबईबाहेर इतर काही शहरांमध्ये शिवसेनेसोबत राहू शकते, त्यादृष्टीने अद्याप चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवडणुकीच्या या रणधुमाळीत ठाकरे बंधूंसमोर मतदारांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन टाळणे ही त्यांच्यासाठी मोठी कसोटी असेल. तसेच, मुंबईतील उत्तर भारतीय मतदार भाजपच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता असल्याने, मराठी बहुल भागातील जास्तीत जास्त मराठी मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांना विशेष रणनीती आखावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App