विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Raj Thackeray उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा बुधवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली.Uddhav Raj Thackeray
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय. त्यातही उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजपने जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज एकत्र आलेत.Uddhav Raj Thackeray
राऊतांचे म्हणणे काय?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्यात फक्त तीन शब्दांत आपले नेमके म्हणणे मांडले आहे. ‘उद्या १२ वाजता’ असे वाक्य लिहून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एक फोटो ट्विट केलाय. त्यात ठाकरे बंधूंच्या हातांमध्ये गुलाबांच्या फुलांचा एक मोठा गुच्छ दिसतोय. राऊत यांनी दुसरे ही एक ट्विट काही वेळांनी केले आहे. त्यात उद्या दुपारी १२ वाजता हॉटेल ब्लू सी वरळी असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जातेय.
उद्धव यांनीच पक्ष सोडायला भाग पाडले
ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते राम कदम म्हणाले की, ‘राज ठाकरे यांनी पक्ष सोडला नव्हता. त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडायला भाग पाडले होते. मात्र, आता त्यांना राज यांची आवश्यता आहे. त्यामुळे ते त्यांच्या दारी गेलेत. कोविडच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. जनतेच्या कफनमध्ये पैसे खाल्ले. आता दोघेही मराठी माणसांवर बोलतील. मात्र, यांना आवश्यकता असेल, तेव्हा मराठी माणूस आठवतो. हे किती एकत्र येऊ द्या. त्यांचा आकडा ३५-४० च्या वर जाणार नाही,’ अशी टीका त्यांनी केली.
ठाकरे गट-मनसे जागावाटप संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे बंधुंच्या या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युलाही आता समोर आला आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत मित्रपक्षांमध्ये जागांचे वाटप निश्चित झाल्याचे समजते. ठाकरे गट – १४५ ते १५० जागांवर, मनसे – ६५ ते ७०, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० ते १२ जागा लढणार असल्याची माहिती मिळत आहे.
उबाठाने हक्काच्या 12 ते 15 जागा मनसेसाठी सोडल्या
या युतीमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे, ठाकरे गटाने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या हक्काच्या 12 ते 15 जागा मनसेसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांवर निवडून आलेले बहुतांश माजी नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. तिथे ठाकरे गटाकडे सध्या तगड्या उमेदवारांची उणीव असताना, मनसेकडे मात्र त्याच प्रभागांमध्ये ताकदवान चेहरे उपलब्ध आहेत. हीच ‘शिंदे’ फॅक्टरची धास्ती ओळखून ठाकरे गटाने व्यावहारिक पाऊल उचलत या जागा मनसेच्या झोळीत टाकल्या आहेत.
मुंबईचे महत्त्व काय?
मुंबई महापालिकेचे देशाच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. ही देशातली सर्वात मोठी महापालिका आहे. मुंबई महापालिकेचा 2025-2026 साठीचा अर्थसंकल्प तब्बल 74 हजार 427 कोटी रुपयांचा आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरापेक्षाही मुंबई महापालिकेचे बजेट मोठे आहे. त्यामुळेच भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने येथे जोर लावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App