विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्राने आणलेले संचार साथी अॅप हे मुळात हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस तंत्रज्ञान असल्याचा मोठा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेची हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर जनर ठेवावी, असे ते म्हणालेत.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आजही अनेक पक्षप्रवेश झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी वरील आरोप केला. ते म्हणाले, आपल्या पक्षात कालही प्रवेश झाले. ठाण्यातील काही कार्यकर्ते गद्दारांसोबत गेले होते. ते परत आलेत. आजही काहीजण परत आलेत. थोडक्यात आता गद्दारांचा बुडबुडा फुटला आहे. त्यांच्यात आता अक्षरशः मारामारी व बाचाबाची सुरू आहे. त्याला कंटाळून किंवा त्यांचे खरे रूप समजल्यामुळे हे लोक पुन्हा शिवसेनेत येत आहेत. त्याचबरोबरीने भाजप व राष्ट्रवादीचे लोकही आपल्या पक्षात येत आहेत. रोजच पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत. याचे कारण असे की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटला आहे.Uddhav Thackeray
पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले
उद्धव ठाकरे म्हणाले, आज पेपरमध्ये तुम्ही वाचले असेल की, त्यांनी काही ठिकाणची नावे बदलली आहेत. राजभवनाचे लोकभवन व पीएमओचे सेवातीर्थ असे नाव बदलण्यात आले आहे. केंद्र सरकार या नामकरणाच्या आडून आणखी एक गोष्ट करत आहेत. ती गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आली आहे. काही वर्षांपूर्वी तुम्ही पेगासस हे नाव ऐकले असेल. काय होते पेगासस? हे पेगासस जनतेच्या मोबाइलमध्ये टाकून हेरगिरी करायचे. आता पेगाससचे नाव बदलून संचार साथी असे करण्यात आले आहे. म्हणजे हे लोक हेरगिरीच करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर दहशतवादी हल्ले करणाऱ्यांवर नजर ठेवावी.
आता दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटावर कुणीच बोलत नाही. दिल्लीचे बॉम्बस्फोट झाले कसे? त्यात किती लोक गेले? हे बॉम्बस्फोट कुणी केले? पहलगाममध्ये अतिरेकी घुसले कसे? या गोष्टींवर त्यांचे लक्ष नाही. पण ज्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला त्या आपल्याच लोकांवर त्यांचे लक्ष आहे. आम्हीही त्यांच्यासोबत 2019 पर्यंत होतो. ज्या लोकांनी भाजपवर विश्वास दाखवला, त्या लोकांवर ते आता अविश्वास दाखवत आहेत. एवढा कर्मदरिद्रीपणा आजवर कुणी केला असेल असे मला वाटत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे, महायुती सरकारवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे व महायुती सरकारवरही निशाणा साधला. पुढील महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होतील. आज सत्ताधारी पक्षांत हाणामाऱ्या जोरात सुरू आहेत. पैशांची उधळपट्टी सुरू आहे. तुम्ही एक-दोन दिवसांच्या दौऱ्यांसाठी किती कपडे नेणार? हेलिकॉप्टरमध्ये किती सामान नेता तुम्ही? काय करता काय? आता त्यांच्यातील लोकच त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. ज्यांच्यावर धाड टाकली त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पण ज्यांनी धाड टाकली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. हे सर्व फार घाणेरड्या पद्धतीने होत आहे.
आपल्याला देशाचे चित्र असे अपेक्षित नव्हते. हे सर्व वेळेत तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही इकडे परत आला आहात, याचे मला कौतुक वाटते. आणखी असे अनेक लोक आहेत. ते थोडे संभ्रमात आहेत. भाजप म्हणजे देशाचा तारणहार आहे असा समज करून देणे हाच मुळात एक प्रचंड मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्यातून अनेकजण आता जागे होत आहेत. उरलेल्या लोकांना तुम्ही जागे करा. आगामी मुंबई, ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपलाच शिवसेनेचा झेंडा फडकवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App