नाशिक : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत विनोद तावडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मराठी नेते चमकले, पण एकटे अजित पवार घसरले, असे राजकीय चित्र आज निकालाच्या दिवशी समोर आले. Ajit Pawar
– विनोद तावडे यांचा सिंहाचा वाटा
बिहार विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांनी रणनीती ठरविण्यापासून ते उमेदवार ठरविण्यापर्यंत त्याचबरोबर प्रचार करण्यापर्यंत सिंहाचा वाटा उचलला. 2022 पासून भाजपने विनोद तावडे यांच्याकडे बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली. त्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडशी समन्वय साधून सरकार उत्तम चालेल, याची “व्यवस्था” केली. विधानसभा निवडणूक आणि त्याआधीची लोकसभा निवडणूक यांची रणनीती आखण्यात विनोद तावडे आघाडीवर होते. त्यांनी बिहार मधल्या सर्व राजकीय आणि सामाजिक समीकरणांचा अभ्यास करून योग्य समन्वय साधला. पडद्यामागून मोठ्या राजकीय खेळी करत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या जातनिष्ठ राजकीय अजेंड्याला सुरुंग लावला. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडे हे नाव रणनीतीच्या पातळीवर मोठे ठरले. Ajit Pawar
– देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोठा सहभाग नोंदविला. त्यांनी बिहारमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रचार सभा घेतल्याच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या बिहारी जनतेशी वेगवेगळ्या कारणांनी संपर्क साधून त्यांना बिहारमध्ये जाऊन मतदान करायला प्रोत्साहन दिले. याच दरम्यान त्यांनी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत छठपूजेचे मोठे आयोजन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखेच देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये भाजपचे स्टार प्रचारक ठरले. संपूर्ण विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस दिवसाआड महाराष्ट्र आणि बिहार या दोन्ही राज्यांचा दौरा करताना दिसले.
– नड्डांच्या बरोबर शिंदेंचा प्रचार
त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बिहारमध्ये जाऊन प्रचार केला. त्यांच्या शिवसेनेने बिहारमध्ये निवडणुकीत उमेदवार उतरवले नव्हते. परंतु, शिंदे यांनी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या इतर उमेदवारांचा प्रचार केला ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्याबरोबर सुद्धा प्रचारात उतरले या दोन्ही नेत्यांनी एकत्रित प्रचार सभा घेतल्या.
– अजितदादांच्या पदरी अपयश
या राजकीय पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बिहार मधले राजकीय अपयश मात्र ठळकपणे समोर आले. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळावा म्हणून अजित पवारांनी बिहार विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यांना विशिष्ट टक्केवारीत मिळतील. त्यामुळे आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास मदत होईल, असा अजित पवारांचा राजकीय होरा होता. पण त्यासाठी त्यांनी स्वतः प्रचारात जाऊन कुठलेही प्रयत्न केले नाहीत. बिहारची विधानसभा निवडणूक आणि प्रचार सुरू असताना अजित पवार महाराष्ट्रात पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याची उत्तरे देण्याच्या खोड्यात अडकले होते. ते बिहारमध्ये जाऊन प्रचार करू शकले नव्हते. त्याचा दुष्परिणाम निवडणुकीत दिसला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पंधरापैकी कुठल्याच उमेदवाराला 500 पेक्षा जास्त मते मिळू शकली नाहीत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवायचे स्वप्न अधुरेच राहिले. उलट बिहारमध्ये हात दाखवून अवलक्षण केल्याचे अपयश मात्र अजितदादांच्या पदरी आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App