विशेष प्रतिनिधी
पुणे : Jain Muni पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या वादग्रस्त जमीन व्यवहाराबाबत मुंबईत धर्मादाय आयुक्तांपुढे महत्त्वाची सुनावणी होणार आहे. जैन समाजाने या व्यवहाराची संपूर्ण चौकशी करून तो पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांनी या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेत धर्मादाय आयुक्तांना थेट आवाहन केले आहे की, ही जमीन जैन समाजाची आहे, आणि तिचा व्यवहार हा चुकीच्या पद्धतीने झाला आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार रद्द करून न्याय द्यावा.Jain Muni
गुप्तीनंद महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला धर्मादाय आयुक्तांकडे सादर झालेल्या फाइलमध्ये मंदिर नसल्याची नोंद दाखवली गेली होती. मात्र, नव्या अहवालात त्या जागेवर भगवान महावीरांचे मंदिर असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सुरुवातीचा अहवाल दिशाभूल करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. पापकार्यात कुणीही सहभागी होऊ नये, कारण ही केवळ आर्थिक नाही तर धार्मिक भावना दुखावणारी बाब आहे, असे ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीही विश्वास व्यक्त केला की, मुख्यमंत्री जैन समाजासोबत आहेत आणि ते धर्मादाय आयुक्तांना योग्य न्याय देण्यास सांगतील. देशभरातील अनेक ठिकाणी या प्रकरणाविरोधात जैन समाजाकडून आंदोलनं होत असून पुण्यातील मंदिरात भगवान महावीरांच्या प्रतिमेसमोर विशेष पूजा आणि आरती करण्यात येणार आहे.Jain Muni
ट्रस्टींनी बिल्डरकडून घेतलेले 230 कोटी रुपये परत करावेत
जैन समाजाच्या मते, या व्यवहारात मूळ चूक ट्रस्टींकडूनच झाली आहे. जैन मुनी गुप्तीनंद महाराज म्हणाले, गोखले डेव्हलपर्सचे विशाल गोखले यांनी मोठेपणा दाखवत या व्यवहारातून माघार घेतली, पण ज्यांनी हा करार केला. त्या ट्रस्टींनीच सर्व पापांचे प्रायश्चित्त घ्यावे. त्यांनी पुढे म्हटले की, ही जमीन विक्रीचा व्यवहार केवळ बोगसच नाही, तर धार्मिक आणि सामाजिक भावनांवर आघात करणारा आहे. त्यामुळे तो कायमस्वरूपी रद्द केला जावा. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रस्टींनी बिल्डरकडून घेतलेले 230 कोटी रुपये परत करावेत, कारण ती रक्कम जैन समाजाच्या संपत्तीच्या बदल्यात घेतलेली नाही, तर चुकीच्या व्यवहारातून मिळालेली आहे.
भगवान महावीरांकडे पाहून सत्याचं पालन करावं
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतल्याचे गुप्तीनंद महाराज यांनी सांगितले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, राज्य सरकार या प्रकरणात न्याय्य निर्णय घेईल. जैन समाज हा राष्ट्रभक्त, दानशूर आणि शांततेचा मार्ग स्वीकारणारा समाज आहे. हा समाज फक्त देतो, घेत नाही. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आम्हालाच आमच्या भूमी आणि धर्मासाठी लढावं लागत आहे, असे त्यांनी ठामपणे म्हटलं. त्यांनी ट्रस्टींना आवाहन केलं की, त्यांनी भगवान महावीरांकडे पाहून सत्याचं पालन करावं आणि चुकीच्या व्यवहारातून माघार घेऊन समाजाचा विश्वास परत मिळवावा.
प्रश्न केवळ कायदेशीर नाही, तर तो श्रद्धेचा
आजच्या सुनावणीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रीत झाले आहे. जैन समाजाने धार्मिक भावनांच्या आदरार्थ हे प्रकरण फक्त मालमत्तेचा वाद म्हणून नव्हे, तर धर्मसंरक्षणाचा लढा म्हणून उचलला आहे. पुण्यातील हा वाद आता राज्यव्यापी आंदोलनात परिवर्तित होत आहे. मुंबईतील धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयावरून या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जैन समाजाने दिलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटलं आहे की, ही जमीन भगवान महावीरांच्या मंदिराची आहे आणि तिच्या विक्रीचा प्रश्न केवळ कायदेशीर नाही, तर तो श्रद्धेचा आहे. त्यामुळे आजची सुनावणी केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण देशातील जैन समाजासाठी निर्णायक क्षण ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App