विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागण्यांवर आणि त्यांच्या एकत्रित भूमिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली आहे. विरोधकांनी आपला पराभव मान्य केल्याचे आणि त्यांचे अवसान गळाल्याचे दिसत असल्यामुळेच ते एकत्र आले, असे शिंदे म्हणाले. तसेच सन्नाटा कोणाकडे होता? आमच्याकडे की त्यांच्याकडे? असे म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला.Eknath Shinde
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मतदार याद्यांतील चुकांवर बोट ठेवत आयोगावर धारदार प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे मत व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.Eknath Shinde
नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?
सगळे पक्ष एकत्र आल्यामुळे आपण जिंकू, असा विश्वास त्यांना वाटायला हवा होता. मात्र, त्यांना जिंकण्याची खात्री वाटत नाही, उलट महायुती 100 टक्के जिंकणार असा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणुका रद्द करण्याची आणि मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
विरोधक पराभवानंतर सगळ्यांनाच दोष देतात
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या, तेव्हा निवडणूक आयोग त्यांना चांगला वाटला. तेव्हा त्यांनी आयोगावर कोणतेही आक्षेप घेतले नाहीत. जेव्हा त्यांना निवडणुकीत यश मिळते, ते जिंकतात, तेव्हा मात्र सगळेच चांगले असते. पण जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगाला दोष देण्याचे काम ते करत असतात, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीबद्दल बोलताना त्यांनी ‘ईव्हीएम मशीन प्रक्रिया काँग्रेसच्या काळात सुरू झाली,’ याची आठवण करून दिली.
सन्नाटा कोणाकडे होता? शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
विधानसभा निवडणुकीत २३२ जागा जिंकल्यानंतरही महाराष्ट्रात सन्नाटा होता. तसेच मतदार याद्या न दाखवणे हाच पहिला घोळ असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. सन्नाटा कुणाकडे होता? आमच्याकडे की त्यांच्याकडे? असा टोला शिंदे यांनी राज ठाकरेंना लगावला. हे गोंधळून गेल्याचे मी आधीच म्हणालो आहे. आता निवडणुका पुढे ढकला म्हणताय म्हणजे त्यांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाहीये. त्यांना पराभव चाहूल लागली असून, तो समोर दिसू लागलाय. त्यामुळे अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाकरेंच्या काळातील हुकूमशाही पाहिलीये
लोकशाहीच्या नावाखाली चालू असलेली हुकूमशाही आम्ही खपवून घेणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात हुकूमशाही पाहिलीय. नेहमीच्या अधिकाऱ्याला मारणे, कंगना राणावतचे घर तोडणे, नारायण राणेंना जेवताना अटक करणे, पत्रकारांना अटक करणे ही हुकुमशाही त्यांनी दाखवलीय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर याला जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये टाकणार, बर्फाच्या लादीवर झोपवून मारणार ही कुणाची वक्तव्ये होती. ही कुठली लोकशाही आहे. त्यामुळे जे काही बोलतो, ते विचारपूर्वक बोललो पाहिजे. समोरच्या बोट दाखवताना तीन बोटे आपल्याकडे असतात, याचा विचार केला पाहिजे. विरोधकांनी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App