विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange मराठा आरक्षणाच्या जीआरवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. भुजबळ यांनी जरांगे यांच्या ‘अभ्यास’, ‘शिक्षण’ आणि ‘मराठ्यांचे नेतृत्व’ यावर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर, आता मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर तीव्र टीकास्त्र सोडले आहे. भुजबळांमुळे ओबीसींचे वाटोळे होणार आहे. आता जशास तसे वागावेच लागेल आणि आम्ही वागू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.Manoj Jarange
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी भुजबळ आणि ओबीसी नेत्यांवर जोरदार टीका केली. “छगन भुजबळ ज्ञानेश्वरी सांगतो का? अंबाडा येथे कोयते काढू म्हणाला होता. त्याच्यावर गुन्हे दाखल करा. भडकावू भाषण तुम्ही केले. जातीवाद डोक्यात असल्याने मराठ्यांवर अन्याय केला. 1990 मध्ये ‘माधव पॅटर्न’ आणून मराठ्यांना त्रास देण्याचं काम भुजबळांनी केले. अन्याय करणाऱ्यांना अंगावर घ्यावे लागते, आणि मी घेणारच,” असे आव्हानात्मक वक्तव्य त्यांनी केले.Manoj Jarange
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांचा “अभ्यास काय आहे? शिक्षण काय आहे? तो मराठ्यांचा नेता नाही” असा उल्लेख केला होता. यावरून दोघांमध्ये शब्दयुद्ध सुरूच आहे. भुजबळांच्या टीकेला उत्तर देताना जरांगेंनी म्हटले, “तुम्ही मराठ्यांचा आवाज दाबताय, पण आम्ही गप्प बसणार नाही. मतदानासाठी मार खाऊन जगायचे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
तुम्ही बोलला तर आम्ही सोडणार नाही
ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करते मग मनोज जरांगेंवर का नाही? असा सवाल करत “मनोज जरांगे वारंवार भडकावू भाषण करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी,” अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली होती. या आरोपांना उत्तर देताना जरांगे म्हणाले, “तुम्ही तसे वागतात म्हणून गुन्हे दाखल करतात. हे लोक ओबीसी नेते नाहीत, एका जातीचे नेते आहेत. मी जो आरोप केला तोच आरोप भुजबळ करतो. अंतरवाली येथे शांततेत आंदोलन सुरू असताना कोयते काढायची भाषा आम्ही केली नाही. तुम्ही बोलला तर आम्ही सोडणार नाही.”
भुजबळांमुळे ओबीसींचे वाटोळे होणार
मनोज जरांगे पुढे म्हणाले, आमची घरे उद्ध्वस्त केली तर आम्हीही मागे लागणार आहोत. छगन भुजबळांमुळे ओबीसींचे वाटोळे होणार आहे. आम्ही मराठे म्हणतो, ओबीसी आमचेच मात्र ते काहीच म्हणत नाही. प्रत्येकाचे काचेचे घर आहे हे लक्षात ठेवा. त्या पवार साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिले असते तर बरे झाले असते. जशास तसे आता वागावेच लागेल आणि आम्ही वागू. त्यांना धडा शिकवू. आता मराठा समाजाने समजून घ्यावे. आता माघार नाही.
रुग्णालय परिसरात पोलिस बंदोबस्त
दरम्यान, मनोज जरांगे पाटील सध्या उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जरांगे आणि ओबीसी नेत्यांमध्ये सुरू असलेल्या टोकाच्या शाब्दिक युद्धामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून दोन अधिकारी आणि दहापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असलेला 24 तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App