विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anil Parab : शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब येत्या शनिवारी पत्रकार परिषदेतून उत्तर देणार आहेत. यावेळी अनिल परब बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रासंदर्भातही मोठा खुलासा करणार असल्याची माहिती आहे. रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवला गेला आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा गंभीर आरोप केला होता.
रामदास कदम यांचे आरोप काय?
रामदास कदम यांनी दावा केला आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवण्यात आला होता आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताचे ठसे घेतले. कदम यांनी असा दावाही केला की, उद्धव ठाकरेंनीच ही माहिती त्यांना स्वतः दिली होती. बाळासाहेबांचे हाताचे ठसे का घेतले गेले, याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हानही कदम यांनी दिले आहे. यापूर्वीही शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूसंदर्भात उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते.
उद्धव ठाकरेंच्या नार्को चाचणीचे आव्हान
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. “मी भाषणाच्या ओघात बोललो, पण जे बोललो ते खरं आहे,” असे कदम यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी स्वतःची आणि उद्धव ठाकरेंची नार्को चाचणी करण्याचे आव्हान दिले. तसेच, शरद पवार यांनीही त्यावेळी बाळासाहेबांचा मृतदेह घरात ठेवण्यावर आक्षेप घेतल्याचा दावा कदम यांनी केला.
अनिल परब काय खुलासा करणार?
आता अनिल परब रामदास कदम यांच्या आरोपांना कसे प्रत्युत्तर देणार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रासंदर्भात नेमका कोणता खुलासा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेत कदम यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न होईल, अशी शक्यता आहे. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपांना ठाकरे गट कसे उत्तर देईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App