विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षाच्या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणे संदर्भात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलताई गवई हजर राहण्यावरून निर्माण झालेल्या गैरसमज दूर झाला असून त्या अमरावतीमध्ये 5 ऑक्टोबरला आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असा स्पष्ट खुलासा कमलताईंचे दुसरे सुपुत्र राजेंद्र गवई यांनी केला. Kamaltai Gavai
संघाच्या शताब्दी वर्षात या विजया दशमीच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथि म्हणून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा आणि देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई या उपस्थित राहणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याची माहितीही उघड झाली होती. मात्र आता कमलाताई गवई यांच्या नावाने सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले. त्या संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले गेले.
याच मुद्यावरून आता सरन्यायाधीशांची मातोश्री संघाच्या मंचावर जाणार की नाही अशी चर्चा सुरू झाली असून कमलाताई गवई यांच्या मुलानेच आता या विषयावर थेट स्पष्टीकरण दिलं आहे. राजेंद्र गवई कमलताई गवई यांचे पुत्र असून त्यांनी हा कार्यक्रम आणि त्याला कमलाताई यांची उपस्थिती या विषयावर मौन सोडलं आहे.
– राजेंद्र गवईंचा स्पष्ट खुलासा
येत्या पाच तारखेला अमरावतीमध्ये संघाचा कार्यक्रम होत आहे. आईसाहेबांना (कमलाताई गवई) त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं असून, त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आहे असं त्यांचा मुलगा राजेंद्र गवई यांनी स्पष्ट सांगितलं. संघाच्या मुख्य कार्यक्रमांसाठी यापूर्वी नागपूरमध्ये आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहे. इंदिरा गांधींसोबत दादासाहेब गवईंचे अतिशय जवळचे संबंध होते, तर विदर्भातील नेते गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे उत्तम मैत्रीचे संबंध होते. त्यांचे संबंध भावा भावांचे होते, परंतु विचारधारा ही वेगवेगळी होती. कार्यक्रमाला गेल म्हणजे विचारधारा बदलेल असं मुळीच नाही, असं राजेंद्र गवई यांनी ठामपणे सांगितलं.
विरोधकांच्या पोटात दुखतंय
त्या कार्यक्रमात गेले पाहिजे अशा मताचा मी आहे. आमची मैत्री राहील, परंतु आमची विचारधारा ही पक्की आहे. गवई साहेबांच्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे ,सोशल मीडियावर उलट सुलट टीका केली जात आहे, असा आरोप गवई यांनी केला. भूषणजी गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे विरोधक गैरहेतूने टीका टिपणी करत आहेत. काही सकारात्मक देखील टिपण्णी होत आहे पण मी त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. आईसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे, एक मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे मी निश्चितच सांगेन. आम्ही सर्वधर्मसमभावाला मानणारे आहोत, सर्वधर्म समभावाच्या पक्षासोबत काल होतो, आजही आहोत आणि आणि उद्याही राहू, असेही राजेंद्र गवई यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App