विशेष प्रतिनिधी
मुंबई : Marathwada मराठवाड्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून नांदेड, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.Marathwada
नांदेड शहरातील गोदावरी नदीवरील जुना पूल धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. तर जायकवाडी धरणातून विसर्ग कायम असल्याने गोदावरी आणि परिसरातील इतर नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सरी कोसळल्या. यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.Marathwada
पिकांचे नुकसान आणि पूरस्थिती
दोन दिवस उघडीप मिळाल्यानंतर शेतकरी पिकांचे नुकसान भरून काढण्याच्या आशेने कामाला लागले होते. मात्र, शुक्रवारी सकाळपासून झालेल्या पावसाने पुन्हा पिके पाण्यात बुडाली. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मका यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात पूर परिस्थिती आटोक्यात येत असली तरी शेतातील पाणी ओसरायला वेळ लागणार आहे. नुकसानाचे संपूर्ण चित्र समोर येण्यासाठी अजून काही दिवस लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ग्रामीण भागात संकटकालीन परिस्थिती
कमी कालावधीत जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांना पुराने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असली तरी साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. घरांची पडझड, रस्त्यांची हानी आणि शेतीचे प्रचंड नुकसान यामुळे ग्रामीण भागात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे मराठवाड्याचे अर्थचक्र ठप्प होण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांच्या हातचे पीक वाहून गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. पूरग्रस्तांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली असली तरी दीर्घकालीन पुनर्वसनासाठी अजूनही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.
पावसाचा जिल्हानिहाय आढावा
गेल्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत नऊ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 25.3 मिलिमीटर पाऊस झाला, तर नांदेडमध्ये 16.9 धाराशिवमध्ये 11.2 परभणीत 9.9 बीडमध्ये 5.4 हिंगोलीत 3.1 आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 27 व 28 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होणार असून धाराशिव, बीड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू असल्याचे कळते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App