नाशिक : अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून जी स्वबळाची उबळ आणली, तिच्या मागे ताकद नाही, त्या नागपुरात हव्यात जास्त जागा, पण पुण्यात त्यांना भाजपशी घ्यायचा आहे संघर्षाचा पवित्रा!!, हीच दोन प्रमुख कारणे दिसतायेत. बाकी मराठवाड्यात अजितदादांच्या पक्षाला फारशी संधी नाही. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता इतर महापालिकांमध्ये फारसे अस्तित्व नाही. जे थोडेफार राजकीय अस्तित्व उरले आहे, ते जिल्हा परिषदांमध्ये, निवडक कारखान्यांमध्येच!!Ajit Pawar NCP showing off self-reliance by resisting the BJP’s power grab.
सगळे काही पुण्यासाठी
या वास्तवाची जाणीव असून सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीने स्वबळाची उबळ आणली, कारण पुणे जिल्ह्यात आणि पुणे महापालिकेत त्यांना आपले वर्चस्व टिकवून ठेवायचे आहे. पुणे महापालिकेत काँग्रेस आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचे वर्चस्व मोडून भाजपने वर्चस्व निर्माण केले हे खुद्द अजितदादांना आणि शरद पवारांनाच रुचलेले नाही. कारण सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसचे वर्चस्व मोडून अजितदादा आणि शरद पवारांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण केले होते, पण ते फार थोडा काळ टिकून राहू शकले. 2014 नंतर पुण्यात भाजपने स्वतःचे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातले नगरसेवक आणि बळकट नेते फोडले. पुणे महापालिका अजित पवारांच्या हातातून काढून घेतली. याची सल अजितदादांना लागून राहिली आहे. एकदा पुण्यावरचे वर्चस्व गेले की बारामतीतल्या सत्तासूत्रांना हादरे बसणे अवघड नाही याची जाणीव काका + पुतण्यांना आहे म्हणूनच पुणे महापालिका पुन्हा मिळवण्यासाठी अजितदादा आणि शरद पवारांची धडपड सुरू आहे. पुणे महापालिका परत ताब्यात मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेते आतून हातमिळवणी करू शकतात. किंबहुना तसे करण्याचा उद्देश असल्यामुळेच प्रफुल पटेल यांनी नागपुरात मुंबई वगळून महाराष्ट्रात इतरत्र स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ते “स्वबळ” जास्तीत जास्त पुण्यात वापरले जाण्याची दाट शक्यता आहे.
यातूनच मुंबई वगळता इतर ठिकाणी स्वबळावर लढाईची उबळ अजितदादांच्या राष्ट्रवादीने आणली आहे. त्यामुळे महायुतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची “सुटका” होईल आणि आतून किंवा बाहेरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणे करायला “मोकळीक” मिळेल, असा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा राजकीय होरा आहे.
नागपुरात काही मिळणार नाही
ज्या नागपूर मध्ये आज अजितदादांनी एक दिवसाची शिबिर घेतले त्या नागपुरात त्यांच्या पक्षाची ताकद शून्य आहे. जो एकमेव नगरसेवक निवडून आला होता, तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे नागपुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीला फारसे काही मिळायची शक्यता नाही, तरी देखील अजितदादांनी महायुतीत राहायचे असेल तर 40 जागा द्या, अशी दंडात बेटकुळी आणून मागणी केली, जी भाजपने अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नसलेल्या राजकीय लायकीनुसार अमान्य करून टाकली.
नाशकात हाती काही लागण्याची शक्यता नाही
नाशिक महापालिकेत अजितदादांच्या पक्षाच्या वाट्याला महायुतीत राहिले तर तिसरे स्थान स्थान येण्याची शक्यता आहे. कारण नाशिक मध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जास्त बळकट आहेत. त्यांच्या खालोखाल ठाकरे बंधू वर्चस्व टिकवून आहेत. छगन भुजबळांचे नाशिक मधले वर्चस्व भाजपने पूर्ण मोडीत काढले आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण पाहता छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन नाशिक मध्ये काही करतील याची सुतराम शक्यता नाही. उलट त्यांना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अजित पवार यांच्यापेक्षा फडणवीसांची जास्त गरज आहे हेच ओळखून वागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला नाशिकमधून हाती काहीही लागण्याची शक्यता नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App