विशेष प्रतिनिधी
सांगली : Gopichand Padalkar : महाराष्ट्र, हे पुरोगामी राज्य म्हणून गौरवले जाते, जिथे राजकीय संस्कृतीत वैचारिक मतभेद आणि टीकाटिप्पणी ही नेहमीच राजकारणाचा भाग राहिली आहे. पूर्वी, विरोधकांवर टीका करताना एक नैतिक मर्यादा पाळली जायची, ज्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकारणाची ओळख कायम राहिली. पण आता ही नैतिकता आणि मर्यादा हळूहळू लुप्त होताना दिसत आहे. राजकारणातील भाषा आणि वर्तन दिवसेंदिवस खालच्या पातळीवर घसरत चालले आहे. अलीकडेच लक्ष्मण हाके आणि आज गोपीचंद पडळकर यांच्या विधानांनी याची प्रचिती आणखी ठळकपणे दिली आहे.
विरोधकांवर आक्रमक टीका करणे राजकारणात नवे नाही, आणि वैचारिक मतभेद असताना तीव्र टीकाटिप्पणी करणेही चुकीचे नाही. परंतु, ही टीका करताना नैतिकतेची सीमारेषा ओलांडली जाऊ नये, याचे भान राजकीय नेत्यांनी ठेवणे अत्यावश्यक आहे. दुर्दैवाने, आजकाल हे भान हरवत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा परिस्थितीत, महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला साजेसे राजकारण टिकवण्यासाठी, नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखून संयम आणि सौजन्य राखणे गरजेचे आहे.
राजकीय टीका करताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मर्यादा पाळण्याची परंपरा आहे. मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना सर्व मर्यादा ओलांडल्या. जयंत पाटील यांनी आपल्याला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला आणि “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद नाही, यात काहीतरी गडबड आहे,” असे खालच्या पातळीचे वक्तव्य पडळकरांनी जत येथे केले. अशा आक्षेपार्ह भाषेचा वापर करून पडळकरांनी राजकीय वैमनस्याला नवे वळण दिले आहे.
पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले की, त्यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. “जयंत पाटील बिनडोक आहे, दर आठवड्याला ते आपली अक्कल गहाण ठेवतात,” असे पडळकर म्हणाले. तसेच, “जयंत पाटलांनी जतमध्ये माणसे पाठवून माझ्याकडून खंडणी घेतली जाते का, याची चौकशी केली. पण मी त्यांच्यासारखा भिकाऱ्याची औलाद नाही,” असेही त्यांनी निंदनीयपणे म्हटले. अशा प्रकारच्या वैयक्तिक आणि असंस्कृत टीकेमुळे पडळकरांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जयंत पाटलांवर सातत्याने खालच्या पातळीची टीका
सांगली जिल्ह्यातील जत येथे बोलताना पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली ही टीका प्रथमच नाही. यापूर्वीही त्यांनी सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक हल्ले चढवले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी वापरलेली आक्षेपार्ह भाषा आणि खालच्या पातळीचे आरोप यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी यापूर्वी पडळकरांच्या टीकेला संयमाने उत्तरे दिली आहेत, पण पडळकरांचे हे नवे वक्तव्य राजकीय वर्तुळात वादाचा विषय ठरू शकते.
पडळकरांचे वक्तव्य म्हणजे राजकीय संस्कृतीचा अपमान
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या या टीकेने त्यांच्या स्वतःच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “मी जेलमध्ये गेलोय, मला कोणीही बदनाम करू शकत नाही,” असे म्हणत त्यांनी स्वतःच्या कृतींचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अशा प्रकारची भाषा आणि वैयक्तिक हल्ले करून ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळीमा फासत आहेत. पडळकरांच्या या वक्तव्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे, आणि त्यांच्या या वर्तनावर जनतेकडूनही तीव्र नाराजी व्यक्त होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App