नाशिक : मराठीचा मुद्दा उचलून ठाकरे बंधू एकत्र येण्याची वातावरण निर्मिती तर चांगली झाली. ठाकरे बंधू या मेळाव्यात युतीची घोषणा करणार की नाही याविषयी देखील चर्चा झाली. पण काही झाले तरी युती होणे किंवा न होणे हा भविष्यातला थोडा दीर्घकालीन भाग झाला. त्याआधी ठाकरे बंधूंच्या पुढे पहिले आव्हान आहे, ते शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमधली गळती रोखायचे!!
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ज्या पद्धतीने महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी चालवली आहे, ते पाहता कुठल्याच विरोधकांकडे लढण्याची क्षमता असलेले उमेदवारच शिल्लक ठेवायचे नाहीत हे त्यांनी मनाशी पक्के केले आहे. म्हणूनच कुठलीही चाळणी किंवा गाळणी न लावता भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्याचा सपाटा सुरू आहे.
त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भरती सुरू आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सत्तेचे आंबे भरपूर असल्याने ते पाडायसाठी आणि खाण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी होणार हे उघड आहे तसेच घडले देखील आहे. पण सत्तेचे आंबे हे कायम पिकलेले राहणार नाहीत किंवा त्यांची संख्या देखील फार होणार नाही. हे लक्षात घेऊन ठाकरे बंधूंना पुढची रणनीती आखावी लागेल. पक्षातील दुसरी, तिसरी आणि चौथी फळी निवडणूक क्षम करून तिला निवडणुकीच्या रण मैदानात लवकरात लवकर उतरवावे लागेल.
महायुतीच्या डोक्यात सत्तेची हवा
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फार मुत्सद्दी किंवा फार हुशार लोक आहेत असे नाही, उलट त्यांच्यात सत्तेची हवा डोक्यात गेलेले लोकं वाढत चालल्याची लक्षणे दिसून येत आहेत. म्हणून तर गाळणी आणि चाळणी न लावता भाजप सारख्या पक्षात वाटेल त्यांना प्रवेश देण्याची चढाओढ लागली आहे.
ऐक्याचे वातावरण टिकवले तरी साधेल काम
या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी युती करायची घोषणा करण्यापूर्वी आपल्या उरल्या सुरल्या पक्षांची बांधबंदिस्ती करून ऐक्याचे वातावरण टिकवून धरले, तरी त्यांचे काम साधण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीने त्यांच्या यशाची optimum limit गाठली. लाडकी बहीण योजनेने महायुतीच्या पदरात पुरेपूर माप टाकल. पण त्याचे returns लाडक्या बहिणींना पुरेपूर मिळाल्याचे लाडक्या बहिणींचे तरी मत दिसत नाही. त्यामुळे एकीकडे मराठीचा मुद्दा आणि दुसरीकडे महायुतीवर काहीशा नाराज असलेल्या लाडक्या बहिणींचे मन वळवले तरी ठाकरे बंधू राजकीय अस्तित्व टिकवून बाजी मारू शकतात, अशी आज तरी शक्यता दिसत आहे. पण त्यासाठी पक्षातली गळती रोखून ऐक्याची वातावरण निर्मिती टिकवून घराणे हे आव्हान ठाकरे बंधूंनी पेलण्याची आजतरी आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App