नाशिक : काका – पुतण्या एकत्र येणार. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार. महाराष्ट्राच्या राजकारणात “नवा भूकंप” होणार. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी सत्तेची वाटणी होणार, वगैरे “बाता” सध्या मराठी माध्यमांनी बातम्यांच्या रूपाने चालविल्यात. त्याचे वर्णन “पवारनिष्ठ” माध्यमांनी महाराष्ट्राच्या राजकारणात “नवा भूकंप” या शब्दांनी केले असले, तरी प्रत्यक्षात विलीनीकरणाचा नावाखाली भाजपच्या सत्तेपुढे शरणागती आणि अजितदादांच्या सत्तेच्या तुकड्यात आणखी एक वाटेकरी!!, यापेक्षा दुसऱ्या शब्दांमध्ये करता येणार नाही, कारण त्यामध्ये दुसरे काहीही between the lines वाचण्यासारखे नाही.
पवार काका + पुतण्यांनी एकत्र येण्याच्या कितीही डिंग्या मारल्या आणि त्या खऱ्या करून सुप्रिया सुळे यांना केंद्रात adjust केले आणि राज्यात अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहिले, तरी त्यात नवीन काही घडले असे म्हणायची अजिबात गरज नाही. कारण मूळात हा नवा फॉर्म्युलाच नाही. वर्षानुवर्षे शरद पवारांनी हाच फॉर्म्युला रेटून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेवर आपल्या कुटुंबाचे वर्चस्व ठेवले होते. ते तसेच कायम ठेवण्याचा “डाव” याच्या पलीकडे पवारांच्या एकमेकांपासून फुटण्याच्या किंवा विलीनीकरणाच्या बातम्यांना फारसे महत्त्व देण्यात मतलबच नाही.
कारण काही झाले तरी भाजप आपल्या स्वतःच्या वाढत्या सत्तेतला वाटा पवार पुतण्यालाही देणार नाही आणि पवार काकांना देण्याची शक्यता नाही. फार तर पवारांना पुन्हा राज्यसभेवर निवडून आणण्या इतपत मतांची बेगमी करून देईल, त्यापलीकडे भाजप आपल्या सत्तेतला वाटा फुटलेल्या राष्ट्रवादीला किंवा एकत्रित राष्ट्रवादीला देण्याची सुतराम शक्यता नाही. कारण भाजपच्या कुठल्याही राज्यातला सत्तेचा फॉर्म्युला राबविण्याचा इतिहास आणि वर्तमान तसे सांगत नाही.
पवारांना ज्या आपल्या मुलीसाठी राजकीय सोय करून ठेवायची आहे आणि तिचे राजकीय बस्तान आपल्या स्वतःच्या आणि तिच्या मनानुसार बसवायचे आहे, ते बसविण्याची जबाबदारी भाजप घेण्याची शक्यता नाही. कारण भाजपने महाराष्ट्रात स्वतःचे बहुमत आणताना स्वतःच्या पक्षातल्या नेतृत्वांना प्रस्थापित करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी इतर पक्षातल्या नेत्यांची जी काही विशिष्ट गरज लागेल, ती आपल्या सोयीनुसार आणि काही प्रमाणात त्या नेत्यांच्या सोयीनुसार भाजपा जरुर घेईल, पण बाहेरच्या पक्षातल्या नेत्यांच्या मुला- मुलींचे राजकीय भवितव्य आपल्या मांडीवर ओढून घेण्याची शक्यता नाही.
बिहारमध्ये नितीश कुमार आपल्या मुलाचा राज्याभिषेक करायचा तयारी असताना भाजपने त्यांना पुरता पाठिंबा दिलेला नाही. नितीश कुमार हे आपल्या मुलाला संयुक्त जनता दर अर्थात (Janata dal United) पक्षाचा उत्तराधिकारी बनवू शकतात. पण नितीश कुमार यांच्या नंतर तो बिहारचा मुख्यमंत्री बनेलच आणि तो बनविण्यासाठी भाजप नितीश कुमार यांना मदत करेलच, याची कुठलीही गॅरंटी पक्षाच्या नेतृत्वाने दिलेली नाही.
– अजितदादांच्या सत्तेच्या तुकड्यात वाटेकरी
त्याचप्रमाणे शरद पवार आणि अजित पवार आपापल्या राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे की विलीनीकरण करायचे, याचा निर्णय स्वतंत्रपणे किंवा एकत्रित घेऊ शकतील. राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत कारभार केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार अशी विभागणी देखील करू शकतील, पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसून ते दोघेही भाजपच्या सत्तेतला जास्तीचा वाटा आपल्याकडे खेचून घेऊन तो आपापसांत वाटून घेऊ शकतील, ही मात्र फारच दुरापास्त आहे. भाजप राज्यामध्ये आपल्या मंत्रीपदाचा कोटा कमी करून तो राष्ट्रवादीला वाढवून देण्याची किंवा केंद्रात सुप्रिया सुळे मंत्रिपदावर अड्जस्ट करताना स्वतःच्या पक्षाच्या मंत्रिपदांमध्ये काही कमी करतील ही शक्यता बिलकुल नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तशी style of functioning अजिबात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या स्वतःच्या अटी आणि शर्तीनुसारच फुटलेल्या किंवा विलीनीकरण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या सत्तेमध्ये ऍडजेस्ट करून घेतील, (राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारांचे संख्याबळ आठ असून देखील ) त्यापलीकडे ते राष्ट्रवादी काँग्रेसला “वाढीव” बळ देण्याची शक्यता नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App