भारताने ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानवर एक जबरदस्त कारवाई केली. हा हल्ला ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणून ओळखला जातो. काश्मीरच्या पहलगाममध्ये भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेत भारताने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. या कारवाईत भारताने पाकिस्तानमधील ९ प्रमुख दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. ही स्ट्राइक १९७१ च्या युद्धानंतरची सर्वात मोठी मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊयात, हे ऑपरेशन इतकं मोठं का मानलं जातंय आणि त्याच्या 5 महत्वाच्या गोष्टी काय आहेत…
१. प्रथमच पाकिस्तानच्या पंजाबवर थेट हल्ला!
भारतीय सेनेने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या मुख्य भूभागावर, म्हणजेच पंजाब प्रांतावर थेट हल्ला केला आहे. यापूर्वी भारताने POK (पाक-अधिकृत काश्मीर) मध्ये सर्जिकल स्ट्राइक केली होती. पण पंजाब, जिथे पाकची मुख्य लष्करी आणि दहशतवादी हालचाल असते, तिथे पहिल्यांदाच हल्ला झाला. या स्ट्राइकमध्ये बहावलपूर, सियालकोट आणि शेखपूरा जिल्ह्यातील चार दहशतवादी कॅम्प्स उद्ध्वस्त करण्यात आले.
हे होते टार्गेट:
* मरकज सुभान अल्लाह कॅम्प – बहावलपूर (जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय) * मरकज तैयबा कॅम्प – शेखपूरा (लष्कर-ए-तैयबाचा केंद्र) * महमूना जोया कॅम्प – सियालकोट * सरजाल कॅम्प – सियालकोट
हे सर्व कॅम्प भारताच्या सीमारेषेपासून सुमारे १०० किमी अंतरावर होते आणि भारतात हल्ला घडवून आणण्याचे केंद्र होते.
२️. भौगोलिकदृष्ट्या दूरवर पसरलेली स्ट्राइक
ऑपरेशन सिंदूर ही स्ट्राइक एका ठिकाणी मर्यादित नव्हती. भारताने एकाच वेळी पंजाब, POK (पाक-अधिकृत काश्मीर), आणि खैबर पख्तूनख्वा या भागांतील ठिकाणांवर हल्ला केला. यामध्ये मुजफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बाग, आणि भीमबर हे भाग समाविष्ट होते. हे सर्व ठिकाणं म्हणजे दहशतवाद्यांचे सुरक्षित अड्डे होते.
* मुरीदके – लष्कर-ए-तैयबाचा मुख्य ट्रेनिंग सेंटर. याठिकाणी ओसामा बिन लादेन याने मदत केली होती. * सैयदना बिलाल कॅम्प – जैश-ए-मोहम्मदचा मुख्य ट्रांझिट हब. * बहावलपूर – मसूद अजहर याचा गड, येथे पाकिस्तान आर्मीचाही मोठा बेस आहे.
या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं, शस्त्र वापरण्याची तालीम दिली जाते आणि भारतात पाठवण्यासाठी कट रचले जातात.
३️. अवघ्या २५ मिनिटांत ९ ठिकाणी तुफान हल्ला!
ऑपरेशन सिंदूरने एक नवा मापदंड निर्माण केला. भारताच्या तीनही सैन्यदलांनी (थलसेना, वायुसेना, नौदल) यामध्ये सहभाग घेतला. केवळ २५ मिनिटांत ९ ठिकाणी अत्यंत अचूक हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये भारताने अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला, ज्यात स्कॅल्प क्रूज मिसाइल्स, हैमर स्मार्ट बॉम्ब वापरण्यात आले.
या वेळी भारताच्या विमाने पाकिस्तानची हद्द ओलांडली नाहीत. आपल्या हद्दीत राहूनच हल्ले करण्यात आले, जे तांत्रिकदृष्ट्या अतिशय कौशल्यपूर्ण कामगिरी होती.
४️. ८० दहशतवाद्यांचा खात्मा, मसूद अजहरच्या कुटुंबाला मोठा धक्का
या हल्ल्यात सुमारे ८० दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील १० सदस्य आणि त्याचे ४ मुख्य सहाय्यक मारले गेले. बीबीसी उर्दूच्या अहवालानुसार, बहावलपूरमध्ये घडलेला हा हल्ला जैशसाठी मोठा झटका ठरला.
साथच, सैयदना बिलाल कॅम्प जो POK मधल्या मुजफ्फराबादमध्ये होता, तोही पूर्णतः उद्ध्वस्त झाला. हेच दहशतवादी पहलगाममधील जवानांवर झालेल्या हल्ल्यामागे होते.
५️. भारतातील अनेक हल्ल्यांमागे असलेली टोळी लक्ष्यावर!
या ऑपरेशनमध्ये केवळ एका घटनेचा सूड घेतला नाही, तर भारतावर गेले अनेक वर्षे हल्ले करणाऱ्या संघटनांच्या मुळावर घाव घालण्यात आला. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या तीनही संघटनांच्या केंद्रांना लक्ष्य केलं गेलं.
* २००८ मधील मुंबई हल्ला – १६६ बळी, ३०० जखमी * २०१९ मधील पुलवामा हल्ला – ४० जवान हुतात्मा
या सर्व घटनांमध्ये वरील दहशतवादी संघटना सहभागी होत्या. भारताने त्यांच्यावर एकाच वेळी हल्ला करून त्यांच्या ‘छुप्या युद्ध’ तंत्राला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ऑपरेशन सिंदूर – एक ऐतिहासिक धाडस
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, हे ऑपरेशन १९७१ नंतर भारताचा पाकिस्तानवरचा सर्वात मोठा आणि प्रभावी हल्ला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या अचूकपणे, आणि इतक्या व्यापक भौगोलिक क्षेत्रात एकाच वेळी करण्यात आलेली कारवाई ही भारतीय लष्करी क्षमतेचं स्पष्ट उदाहरण आहे.
म्हणूनच, हा केवळ सूड नव्हता, तर एक संदेश होता – भारत आता माघार घेणार नाही! पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या धोरणाला धक्का बसला. भारताची सैन्य क्षमता आणि गुप्तचर यंत्रणा किती सक्षम आहे, हे जगाला पुन्हा समजलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App