विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या पॉलिटिकल साईज पेक्षा जरा जास्तच घेतलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार कार्यक्रमाकडे पाच माजी मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “करेक्ट साईज कार्यक्रम” केला. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि अशोक चव्हाण या तिघांनीच फक्त सत्कार कार्यक्रमाला हजेरी लावली.
महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःच्या पक्षाच्या प्रतिमावर्धनासाठी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा घाट अजित पवारांनी घातला होता. सगळ्या माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर आणून त्यांच्या बरोबरीचे स्थान मिळवायचा अजित पवारांचा डाव होता, आपण मुख्यमंत्री झालो नाही तरी आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचे आहोत असे दाखविण्याचा अजित पवारांचा तो प्रयत्न होता. पण तो सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांनी ओळखला. त्यामुळे शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी त्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
वास्तविक या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मोठमोठी भाषणे केली. खुद्द अजित पवारांनी आपल्या भाषणातून तशी वातावरण निर्मिती केली. पुरोगामी महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही, ती लवकरात लवकर मिळावी, अशी जपमाळ तिथे ओढली गेली. अजित पवारांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आता पुढची शपथ ते मुख्यमंत्रीपदाचीच घेतील, असे सुनील तटकरे यांनी जाहीरच करून टाकले. प्रत्यक्षात अजित पवारांचे राजकीय कर्तृत्व किती आणि ते मुख्यमंत्रीपद खेचून घेण्यासाठी पुरेसे आहे का??, याचा साधा विचार देखील सुनील तटकरे आणि बाकीच्या नेत्यांच्या मनाला शिवला नाही.
-फडणवीसांनी सावरली बाजू
माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार कार्यक्रमाला फक्त विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे तीनच महत्त्वाचे नेते उपस्थित राहिले. एकनाथ शिंदे यांनी आपले प्रतिनिधी म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठविले. या कार्यक्रमात एक-दोन नव्हे तर तब्बल 5 माजी मुख्यमंत्री आलेच नाहीत. त्यामुळे कार्यक्रमाची सगळी रया गेली. हे लक्षात येताच त्याचे पडसाद नेत्यांच्या भाषणात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यक्रम आयोजित केला असला तरी, हा मूळात अराजकीय कार्यक्रम होता. त्यामुळे सगळे माजी मुख्यमंत्री उपस्थित राहिले असते तर बरे झाले असते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर तुम्ही आला नाहीत तर प्रतिनिधी पाठवू नका, असे अजित पवारांना सांगावे लागले. उद्धव ठाकरे आले नाहीत, तेच बरे झाले. कार्यक्रम चांगला झाला, असा टोला नारायण राणे यांनी हाणला.
पण एकूणच हा कार्यक्रम फसला. कारण ज्या हेतूने अजित पवारांनी स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमावर्धनासाठी सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी एकाच स्टेजवर बोलवायचा जो घाट घातला होता, त्यातून अजित पवारांचे फारसे प्रतिमावर्धन तर झाले नाहीच, उलट अजित पवारांनी बोलवून देखील 5 माजी मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले नाहीत, ते कुणीही अजित पवारांना “राजकीयदृष्ट्या” स्वतःच्या बरोबरीचे समजत नाहीत, हे “राजकीय सत्य” प्रस्थापित झाले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App