विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्यातल्या राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात उत्साह पसरला. संपूर्ण जगभर राम नामाचा गजर सुरू झाला. त्यामुळे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा झाकोळली आणि आता आसाम मधून धक्काबुक्कीची बातमी आली. Bharat Jodo Nyaya Yatra was covered in the chanting of the name of Ram across the world
सध्या राहुल गांधी यांची यात्रा पूर्व भारतात आहे. असाममधून जात असताना भारत जोडो यात्रा मध्येच थांबवली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तर त्यांच्या गाडीवर भाजपच्या लोकांना हल्ला केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. असाममध्येच राहुल गांधी यांची बसही जमावाने अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस देऊन जमावाला प्रत्युत्तर दिले.
जयराम रमेश यांनी ट्विटरवरून एक पोस्ट आणि व्हिडीओ ट्विट करून त्यांच्या कारवर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. काही वेळापूर्वी सुनीतपूरच्या जुमुगुरीहाट येथे माझ्या गाडीवर भाजपच्या लोकांनी हल्ला केला. गाडीच्या विंडशील्डवर लावलेले भारत जोडो यात्रेचे स्टिकरही फाडण्यात आले. हल्ला करणाऱ्याने स्टिकरवर पाणी फेकले. भारत जोडो यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या. पण आम्ही संयम ठेवला. आम्ही गुंडांना माफ केलं. पण ते वेगाने आमच्या दिशेने आले. असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडूनच हे सर्व होत आहे, यात काहीच शंका नाही. पण आम्ही घाबरलेलो नाही. आम्ही संघर्ष करत राहू, असे जयराम रमेश यांनी सांगितले.
तुमचे गुंड यात्रा रोखू शकत नाही
जयराम रमेश यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी निषेध नोंदवला आहे. आमचा ताफा असाममध्ये रॅलीच्या ठिकाणी चालला होता. तेव्हा जुमगुरीहाटमध्ये मुख्यमंत्री सरमा यांच्या गुंडांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे कॅमेरामन आणि इतर सदस्यांवर हल्ला केला. त्यात दोन महिलांचा समावेश होता. या गुंडांनी जयराम रमेश यांच्या गाडीवरही हल्ला केला. त्यांच्या कारवरील स्टिकर फाडले. त्यावर पाणी फेकले, असं सांगतानाच मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमची यात्रा रोखू शकत नाही. तुमचे गुंड आमची यात्रा रोखू शकत नाही, असे सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, तर काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदविला.
राज्यातील सरकार राज्यातील जनतेला धमकावत आहे. भारत जोडो यात्रेत सामील होऊ नका म्हणून सांगत आहे. आमच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जा नाही. आमच्या पक्षाचे झेंडे आणि बॅनर्सची नासधूस केली जात आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
मोदी मोदींचे नारे
दरम्यान, सोनितपूर जिल्ह्यातून जाणारी राहुल गांधी यांची यात्रा रोखण्यात आली. जमावाने राहुल गांधी यांची यात्रा रोखली. त्यामुळे राहुल गांधी बसमधून उतरले. पण सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी गर्दी पाहता राहुल गांधी यांना बसमध्ये बसण्यास सागितलं. यावेळी जमावाने राहुल गांधी यांच्यासमोरच मोदी – मोदीच्या घोषणा दिल्या. मात्र, हे सर्व दृश्य पाहून राहुल गांधी यांनी स्मितहास्य केले. जमावाला पाहून त्यांनी स्वागत फ्लाईंग किसही दिला.
पण हे सगळे तेव्हा घडले, ज्यावेळी संपूर्ण देशभरात आणि जगभरात राम जन्मभूमी मंदिराच्या लोकार्पणाचा प्रचंड उत्साह पसरला आहे. त्यामुळे राहुल गांधींची भारत जोडून न्याय यात्रा मूळातच झाकोळली गेली आहे. त्यामुळे बातमीची पुडी सोडण्यात आली आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App