‘’…ही तीन माणसं जरा मला संशायस्पद वाटतात’’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : दोन दिवसांपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात महाबंडखोरी झाली. जवळपास ३५ आमदार फुटून शिंदे-फडणवीस सरकारकडे गेले. एवढच नाहीतर खुद्द अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच खळबळ उडाली. राज्यातील या राजकीय महानाट्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. MNS President Raj Thackerays reaction to political developments in Maharashtra
पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘’राज्याच्या राजकारणात जे काही झालंय, ते अत्यंत किळसवाणं आहे. तुम्ही जर जनमताचा कानोसा महाराष्ट्रभर घेतला, तर प्रत्येक घरात तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. बाकी दुसरं तुम्हाला काहीही ऐकायला मिळणार नाही, हा मतदारांचा घोर अपमान आहे.या अगोदरही मी भाषणात बोललो आहे, परंतु या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर मी काही दिवसांमध्ये मेळावा घेणार आहे त्यामध्ये बोलेन.’’
याचबरोबर, ‘’या सगळ्या गोष्टींची महाराष्ट्रात सुरुवात केली, शरद पवारांनी. त्यांनी जो पहिला १९७८ मध्ये पुलोद सरकारचा प्रयोग केला. त्यावेळी काय केलं, असं या अगोदर कधी महाराष्ट्रात झालंच नव्हतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची सुरुवात शरद पवारांकडूनच झाली आणि शेवट पवारांकडेच झाला.’’ असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला.
याशिवाय, ‘’प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ ही माणसं अजित पवारांबरोबर जाणारी तशी नाहीत, त्यामुळे ही तीन माणसं जरा मला संशायस्पद वाटतात. संशायस्पद म्हणजे अजित पवारांबरोबर जाऊन मंत्रीपद स्वीकारतील आणि असं काहीतरी वेगळं करतील. परवा दिवशी अजित पवारांनी एक विधान केलं होतं की, सगळ्या होर्डिंग्जवरती शरद पवारांचे फोटो लावा, हे सगळं अनाकलनीय आहे. त्यामुळे उद्या जर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झालेल्या दिसल्या तर मला आश्चर्य नाही वाटणार. कारण, ही गोष्ट काल अचानक घडली असं नाही. ही गोष्ट गेली कित्येक दिवस सुरू होती. गेली कित्येक दिवस वातावरणात सुरू होती आणि काल दिसली. इतका चुकीचा कॅरम फुटला आहे ना, की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत काही कळत नाही. दुर्दैवी परिस्थिती आहे महाराष्ट्राची, असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं. घड्याळ्याने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं, मला माहीत नाही.’’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App